
मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील चिरागनगर परिसरात बुधवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास दरड कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
पीडितांसाठी मदतीची घोषणा
महापौर रितू तावडे यांनी बुधवारी कुर्ला दरड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांसाठी चार लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या प्रत्येकाला ५०,००० रुपयांची मदत दिली जाणार असल्याचंही महापौरांनी जाहीर केलं आहे.
घटनेची माहिती मिळताच महापौरांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि पीडितांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. तसंच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व यंत्रणांना बचावकार्य अधिक वेगाने आणि योग्य समन्वयाने करण्याचे निर्देश दिले, असंही बीएमसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगर) डॉ. अविनाश ढाकणे, 'एल' विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) अनिल जाधव यांच्यासह इतर संबंधित अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.
बुधवारी पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांनी मुंबईच्या कुर्ला भागातील राठोड मेडिकलजवळच्या चिराग नगरमधील गौशिया चाळीवर दरड कोसळली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. डीसीपी गणेश शिंदे यांच्या माहितीनुसार, पावसामुळे ही दरड कोसळली.
घटनेनंतर, बचावकार्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व टीम्ससोबत पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले. यामध्ये बीएमसी, एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
डीसीपी शिंदे यांनी एएनआयला सांगितलं, "पावसामुळे घाटकोपर पोलिसांच्या हद्दीतील अशोकनगर परिसरात दरड कोसळली आहे. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. पोलीस कर्मचारी, बीएमसी, एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांच्या टीम इथे तैनात आहेत. ही घटना पहाटे साडेतीन-पावणे चारच्या सुमारास घडली. अजूनही ४-५ जण अडकल्याची शक्यता आहे."
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सांगितलं की, त्यांचे अधिकारी, कर्मचारी, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि इतर यंत्रणा ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सापडलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचं काम सुरू आहे.