
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांचा उत्सव खर्च यंदा कोट्यवधींच्या घरात पोहोचला आहे. मंडप, सजावट, सुरक्षा आणि लाखो भाविकांसाठीच्या व्यवस्थेवर हा खर्च होतोय. त्यातच वाढत्या महागाईमुळे बजेट आणखीच ताणलं गेलं आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणी आयोजित करणाऱ्या 'चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळा'चं बजेट यंदा जवळपास २ कोटी रुपये आहे. पण महागाईमुळे हे बजेट २.२५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. फक्त मंडप उभारणीचा खर्चच जवळपास ५० लाख रुपये आहे. मंडळाचे खजिनदार अतुल केरकर यांनी सांगितलं की, १९२० साली स्थापन झालेलं हे मंडळ यंदा १०७ वं वर्ष साजरं करत आहे.
खर्चाबद्दल 'ANI' ला माहिती देताना केरकर म्हणाले, "आमचं एकूण बजेट २ कोटींच्या आसपास आहे. पण दरवर्षी महागाई वाढत असल्याने ते आता साधारण २.२५ कोटींपर्यंत जातंय." या खर्चासाठी कॉर्पोरेट जाहिराती आणि स्पॉन्सरशिपमधून निधी उभा केला जातो. केरकर यांनी सांगितलं की, दरवर्षी अनेक कंपन्या त्यांना स्पॉन्सर करतात आणि यंदा अदानी ग्रुपनेही मदत केली आहे. पण जाहिरातीतून एकूण किती उत्पन्न मिळालं, हे त्यांनी उघड केलं नाही.
तर दुसरीकडे, गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा' आयोजित करणाऱ्या 'लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळा'चे अध्यक्ष किरण तावडे यांनी सांगितलं की, जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग ते समाजकार्यासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी वापरतात. "जाहिरातीतून मिळणाऱ्या एकूण पैशांपैकी ८० ते ८५ टक्के रक्कम थेट समाजोपयोगी कार्यक्रम, रक्तदान शिबिरं, आरोग्य उपक्रम आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेवर खर्च केली जाते," असं तावडे यांनी स्पष्ट केलं.
चिंचपोकळीच्या चिंतामणी मूर्तीच्या किमतीबद्दल विचारल्यावर केरकर म्हणाले की, मंडळ बाप्पाच्या मूर्तीची किंमत ठरवत नाही. मूर्तिकार सिद्धेश डिघा हे मूर्ती घडवतात आणि त्यांना दरवर्षी मानधन (दक्षिणा) दिलं जातं. "आमच्या समितीच्या परंपरेनुसार, त्यांना दरवर्षी दक्षिणा दिली जाते," असं केरकर यांनी सांगितलं. केरकर यांनी सांगितलं की, फक्त मंडप उभारणीचा खर्चच जवळपास ५० लाख रुपये आहे.
दरम्यान, किरण तावडे यांनी सांगितलं की, गणेश गल्लीचं मंडळ गेल्या २५ वर्षांपासून भारतातील प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती साकारत आहे. यंदा वैष्णव परंपरेतील चिंतपूर्णी मंदिरावर आधारित देखावा तयार केला आहे.
लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने, त्यांच्या सुरक्षेवर आणि गर्दीच्या नियोजनावरही मोठा खर्च होतो. केरकर म्हणाले की, चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी खासगी सुरक्षा एजन्सी नेमण्यात आल्या आहेत. तसंच, तीन वेगवेगळ्या गल्ल्यांमधून येण्या-जाण्याचे मार्ग वेगळे ठेवले आहेत, जेणेकरून "चेंगराचेंगरीची शक्यता कमीत कमी राहील."
तावडे यांनी सांगितलं की, मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार, ६,००० स्वयंसेवक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत पोलीस, होमगार्ड आणि खासगी सुरक्षा कर्मचारीही आहेत. देखरेखीसाठी १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी १ लाख ते १ लाख ७ हजार भाविक येतील, असा अंदाज केरकर यांनी व्यक्त केला. सोमवारपासून मुंबईभरात १० दिवसांच्या गणेशोत्सवाला पारंपरिक उत्साहात सुरुवात झाली आहे.