
मुंबई : मुंबईतील जलवाहिन्यांच्या दुरुस्ती आणि स्थलांतराच्या कामामुळे येत्या २७ जानेवारी (मंगळवार) पासून मुंबईतील काही महत्त्वाच्या भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुलुंड आणि भांडुप परिसरातील मुख्य जलवाहिन्यांच्या जोडणीचे काम हाती घेतले असून, याचा फटका मुंबईतील 'एस' व 'टी' विभाग तसेच ठाण्यातील काही भागांना बसणार आहे.
सुरुवात: मंगळवार, २७ जानेवारी २०२६ (सकाळी १०:०० वाजेपासून)
समाप्ती: बुधवार, २८ जानेवारी २०२६ (सकाळी १०:००/११:०० वाजेपर्यंत)
१. मुलुंड (टी विभाग - पश्चिम): वैशालीनगर, मुलुंड वसाहत, स्वप्ननगरी, योगी हिल, अमर नगर, जय शास्त्री नगर, हनुमानपाडा, राहुल नगर, वीणा नगर, मॉडेल टाऊन मार्ग, बी. आर. मार्ग आणि गुरुगोविंद सिंग मार्ग लगतचा परिसर.
२. मध्य मुलुंड व परिसर (टी विभाग): लाल बहादूर शास्त्री मार्ग (LBS), मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता, डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, महात्मा गांधी मार्ग, नाहुरगाव, झवेर मार्ग, नागरी वसाहती आणि डम्पिंग रोड परिसर.
३. भांडुप (एस विभाग): खिंडिपाडा परिसरातील लोअर आणि अप्पर खिंडिपाडा भाग.
४. ठाणे शहर: किसन नगर (पूर्व व पश्चिम) आणि भटवाडी या भागांतील पाणीपुरवठाही पूर्णपणे बंद असेल.
मुलुंड (पश्चिम) येथे २४०० मिमी व्यासाच्या वैतरणा मुख्य जलवाहिनीवरील जोडण्या नवीन २७५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर स्थलांतरित केल्या जाणार आहेत. तसेच भांडुप येथील जलवाहिनीवर लोखंडी झाकण बसवण्याचे तांत्रिक काम केले जाणार आहे, ज्यामुळे भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत होईल.
पाणी कपातीच्या काळात पाण्याचा साठा करून ठेवावा आणि त्याचा वापर काटकसरीने करावा.
पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, जेणेकरून आरोग्याची काळजी घेतली जाईल.