
उल्हासनगर - ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेने ग्रस्त असलेल्या पतीने आधी पत्नी आणि अल्पवयीन मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा प्रकार उल्हासनगर कॅम्प क्र. १ मध्ये घडला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
आत्महत्या केलेल्या पतीचे नाव पवन पहुजा असून तो सोनार गल्ली परिसरातील एका दुकानात कामाला होता. त्याच्यावर कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या होत्या, मात्र वाढत्या आर्थिक अडचणींमुळे तो प्रचंड मानसिक तणावात होता. गुरुवारी मध्यरात्री त्याने पत्नी नेहा आणि ८ वर्षांची मुलगी रोशनी यांची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा केला असता पवनच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ सापडला, ज्यात त्याने आपल्या कुटुंबाला संपवण्यामागचं कारण सांगितलं आहे. या व्हिडिओत आर्थिक संकटामुळे मानसिक खच्चीकरण झाल्याचं स्पष्ट दिसून येतं. त्यानंतरच त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट होतं.
तिघांचेही मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
ही घटना समोर आल्यानंतर परिसरात प्रचंड शोक आणि संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटना टाळण्यासाठी सरकारने आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
या घटनेनंतर मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आर्थिक अडचणी, नैराश्य आणि आत्महत्येचे वाढते प्रमाण पाहता, प्रशासनाने तात्काळ मदत केंद्रे, समुपदेशन सेवा आणि आर्थिक सहाय्य योजना राबवाव्यात, असे सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे.
उल्हासनगरमधील ही घटना केवळ एक कौटुंबिक शोकांतिका नसून, ती समाजातील आर्थिक असमानता, मानसिक आरोग्य आणि प्रशासनाच्या अपयशाचं प्रतिबिंब आहे. अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाज, सरकार आणि नागरी संस्था सर्वांनी मिळून सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे.