
ठाणे : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक करण्यात आली. मात्र अटक केल्यानंतर काही वेळातच त्यांची तब्येत बिघडली. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तात्काळ ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अटकेनंतर आता सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.
डॉक्टरला मारहाण प्रकरणात अटक, नंतर रुग्णालयात दाखल
डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यांना अटक करण्यात आली. अटक झाल्यावर त्यांची त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेण्यात आलं. इथेच त्यांची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात आलं. हृदयासंबंधी त्रास होत असल्याने त्यांना लगेचच ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरला रमेश म्हात्रे यांनी मारहाण केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं. त्यानंतर रमेश म्हात्रे यांना अटक झाली. मात्र अटकेनंतर त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यांची तब्येत खरंच बिघडली की त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
दरम्यान, सोमवारी सकाळी ६ जुलै रोजी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एक गर्भवती महिला उपचारासाठी आली होती. पण या रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्या रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले नाही. त्यानंतर रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात फोन केला, पण डॉक्टरांनी फोन उचलला नाही, त्यानंतर रमेश म्हात्रे त्यांच्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात आले आणि तिथे कर्तव्यावर असलेले डॉक्टर, इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
रमेश म्हात्रे यांनी या प्रकरणी माफी मागितली. मात्र त्यांनी डॉक्टरला मारहाण केल्याची बाब नाकारली आहे. आपण अत्यंत महत्त्वाच्या, गंभीर विषयावर बोलत होतो, त्यावेळी महिला डॉक्टर सतत फोनवर बोलत होत्या. त्यामुळे मी त्यांच्या हातावर फटका मारला, त्यांना मारहाण केली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.