
मुंबई : दररोज लोकलमधील प्रचंड गर्दीचा सामना करणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. लोकलच्या 12 डब्यांचे 15 डब्यांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल आजपासूनच लागू करण्यात आला आहे.
नव्या निर्णयानुसार, सीएसएमटी ते अंबरनाथ, कल्याण, बदलापूर आणि कर्जत या मार्गांवरील काही लोकल फेऱ्यांमध्ये तीन अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे या गाड्यांची प्रवासी क्षमता वाढणार आहे.
मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल सेवा प्रथम ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू करण्यात आल्या होत्या. त्यावेळी अशा 16 फेऱ्या होत्या. त्यानंतर वर्ष 2021 मध्ये आणखी सहा फेऱ्यांची भर पडली. आता नव्याने 10 फेऱ्या वाढवल्यानंतर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यांची एकूण संख्या 32 वर पोहोचली आहे.
मध्य रेल्वेवरील वाढती गर्दी पाहता 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती. कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथ मार्गांवर सकाळ-संध्याकाळ होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र उपनगरीय रेल्वेच्या एकूण फेऱ्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मध्य रेल्वेच्या 9,840 लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. केवळ काही विशेष 12 डब्यांच्या गाड्यांचे 15 डब्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.