
Mumbai BMC News: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा आणि कडक शिस्तीचा अध्याय सुरू केला आहे. कामाच्या वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन बीएमसीने आता कर्मचाऱ्यांच्या हजेरीला थेट पगाराशी जोडले आहे.
ऑक्टोबर 2025 पासून ‘माय बीएमसी’ अॅपवरील पे-स्लिप पाहिल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारात झालेली कपात पाहून आश्चर्य व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर बीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की हा बदल हजेरी प्रणाली अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी करण्यात आला आहे.
नव्या नियमांनुसार, कर्मचारी ठरलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे आणि निश्चित वेळेपर्यंत थांबणे बंधनकारक आहे.
30 मिनिटांपर्यंत उशीर किंवा लवकर जाणे झाल्यास त्या वेळेप्रमाणे वेतन कपात केली जाईल.
जर एखादा कर्मचारी एक तास उशीर झाला किंवा एक तास आधी निघाला, तर त्याचा अर्धा दिवस रजा म्हणून गणला जाईल.
आणि जर हजेरीची दोन्ही वेळा पाळल्या गेल्या नाहीत, तर पूर्ण दिवसाची रजा वजा केली जाईल.
रजा घेण्यासाठी आता आगाऊ मंजुरी घेणे आवश्यक आहे.
अचानक रजा लागल्यास, तत्काळ अर्ज आणि मंजुरी घ्यावी लागेल.
मंजुरीशिवाय घेतलेली रजा ही अनधिकृत गैरहजेरी म्हणून नोंदवली जाईल. एवढेच नव्हे तर अशा प्रकरणात संबंधित कर्मचारी आणि मंजुरी न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या 10% वेतनावरही परिणाम होऊ शकतो.
प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त पाळण्याचे आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. आता अगदी काही मिनिटांचा फरकही वेतन कपातीचे कारण ठरू शकतो. त्यामुळे “कामावर वेळेत पोहोचा, अन्यथा थेट पगारात कपात” हा बीएमसीचा थेट संदेश कर्मचाऱ्यांना दिला गेला आहे.