
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ दरम्यान मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. ईव्हीएम मशिन्स, मतदार याद्या आणि मतदान व्यवस्थेबाबत अनेक तक्रारी समोर येत असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अनेक मतदान केंद्रांवर मतदारांना दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी ईव्हीएम मशिन्स अचानक बंद पडत असून, तर काही ठिकाणी मशिन्सना करंट लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे मतदारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जर अशा पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू राहणार असेल आणि मतदारांना सतत त्रास सहन करावा लागत असेल, तर ईव्हीएमचा आग्रह कशासाठी, असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका का घेण्यात येऊ नयेत, असा थेट प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला केला.
निवडणूक आयोगाकडून सरकारला मदत होईल अशाच प्रकारच्या कृती केल्या जात असल्याचा आरोप करत, मतदारांना होणाऱ्या त्रासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे जाधव यांनी नमूद केले. “मला यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही,” असे स्पष्ट मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मतदार याद्यांमधील गोंधळावर बोलताना जाधव यांनी सांगितले की, मागील आमदारकीच्या निवडणुकीत मतदान केलेल्या अनेक मतदारांची नावे यावेळी यादीत आढळत नाहीत. नाव कट कोण करत आहे, मतदार यादी सतत का बदलली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही ठिकाणी दुबार नावे कायम असून, तर योग्य मतदारांची नावे काढून टाकल्याचा आरोपही त्यांनी केला.
अशा प्रकारचा गोंधळ निर्माण करून मतदान प्रक्रिया राबवली जात असेल, तर मतदारांनी लोकशाहीसाठी मतदान करायचे की हुकूमशाहीकडे नेणाऱ्या प्रक्रियेसाठी, असा प्रश्न निर्माण होतो, असे मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केले.