MNS Bala Nandgaonkar : “जीवनात ही घडी अशीच राहू दे”, फोटो शेअर करत ठाकरे बंधूंच्या एकतेवर बाळा नांदगावकर भावुक

Published : Jul 06, 2025, 05:37 PM IST
bala nandgaonkar sharing a photo

सार

MNS Bala Nandgaonkar : वरळी डोममध्ये झालेल्या मराठी विजय मेळाव्यात २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले. दोघांनीही एकत्र राहण्याचा संकेत दिला, ज्यामुळे मराठी जनतेत उत्साहाला उधाण आले.

मुंबई : तब्बल २० वर्षांनंतर एका ऐतिहासिक आणि भावनांनी ओथंबलेल्या क्षणाला मराठी जनतेने डोळ्यांनी साक्षी दिली. वरळी डोममध्ये भरलेल्या मराठी विजय मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधू एकाच मंचावर एकत्र आले. मंचावर त्यांचं आलिंगन, प्रेमाने दिलेली कौतुकाची थाप आणि त्यांचे भाषण या सगळ्यांनी हजारोंच्या गर्दीत उत्स्फूर्त जल्लोष उसळला.

"एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी" : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी.” राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून दिली आणि “मराठी माणूस एकत्र ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत” असं ठामपणे सांगितलं. त्यांच्या या संयुक्त उपस्थितीने मराठी जनतेच्या हृदयात नव्या आशेचा किरण निर्माण केला.

बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे भावुक प्रार्थना

या ऐतिहासिक क्षणानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत भावनांनी ओथंबलेली पोस्ट लिहिली. ते म्हणाले, "याचसाठी केला होता अट्टाहास. दोन दशके वाट पाहिलेला क्षण आज पाहिला. बाळासाहेब जिथे असतील तिथून हा सोहळा पाहून आनंदले असतील. राजकीय आकांक्षांपलीकडे जाऊन ठाकरे बंधू एकत्र दिसावेत, हीच माझी इच्छा होती. आज ती पूर्ण झाली. आणि तीही आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी! पांडुरंगाकडे आता एकच मागणी 'जीवनात ही घडी अशीच राहू दे…'"

मेळाव्याचं राजकीय वर्तुळात मिश्र स्वागत

उद्धव आणि राज यांचं एकत्र येणं पाहण्यासाठी हजारोंनी गर्दी केली होती. मंचावर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक करत त्यांच्या भाषणानंतर प्रेमाने हात मिळवला आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली. राजकीय पातळीवर या एकत्र येण्याच्या प्रत्यक्ष घोषणा झाली नसली तरी संकेत मात्र स्पष्ट आहेत. दरम्यान, या मेळाव्यात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह लहान मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र काँग्रेसचा एकही बडा नेता अनुपस्थित राहिला. त्यामुळे काँग्रेसचा पुढील भूमिका काय असेल, हे सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

राजकीय विभाजनाच्या दशकानंतर, मराठी माणसाच्या मनात एकतेचा नवा किरण फुललेला दिसतोय. बाळासाहेबांची स्वप्नं पुन्हा एकदा मूर्त स्वरूपात साकार होताना दिसत आहेत. बाळा नांदगावकर यांची ही प्रार्थना “ही घडी अशीच राहू दे” आता लाखो मराठी मनांची भावना बनली आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!
आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे