'तरुणांना हिणवू नका'; शिवरायांचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Published : Jul 30, 2026, 12:44 PM IST
Uddhav Thackeray

सार

मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आजच्या Gen Z पिढीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. 

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या Gen Z पिढीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी म्हटलं की, आजच्या तरुणांना 'कॉक्रोच' म्हणून हिणवलं जात आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनीही अल्पवयात पराक्रम गाजवला असताना मुघलांनी त्यांना 'उंदीर' (चूहा) म्हणून हिणवलं होतं. इतिहासात अनेकदा तरुणांनी विरोधाला न जुमानता समाजाला दिशा दिली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

'Gen Z ला कमी लेखू नका

उद्धव ठाकरे म्हणाले, "आज ज्यांना 'कॉक्रोच' म्हणून अपमानित केलं जात आहे तेच Gen Z आहेत. साधारण 13-14 ते 27-28 वर्षे वयोगटातील ही पिढी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला होता. त्यांनाही मुघलांनी 'उंदीर' म्हणून हिणवलं होतं. संत ज्ञानेश्वरांनीही अल्पवयात 'ज्ञानेश्वरी' लिहिली. त्या दोघांनाही त्यांच्या काळात मोठा विरोध सहन करावा लागला."

नीट आंदोलनातील तरुणांचं कौतुक

उद्धव ठाकरे यांनी नीट प्रश्नपत्रिका गैरव्यवहाराविरोधात देशभर आंदोलन करणाऱ्या तरुणांचं कौतुक केलं. या आंदोलनामुळे तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरली. यामुळे देशभर लोकशाहीचा आत्मा पुन्हा जागा झाला, असं ते म्हणाले. त्यांच्या मते, लोकशाही संपल्याची भावना निर्माण झाली असताना देशातील तरुणांनी रस्त्यावर उतरून लोकशाहीला नवसंजीवनी दिली.

संसद सदस्य वाढवण्याऐवजी रोजगार वाढवा

उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्यापेक्षा तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सरकारने भर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्याच्या लोकसभेतच सर्व सदस्यांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मग सदस्यसंख्या 850 पर्यंत वाढल्यास कामकाज कसं चालणार?"

भाजपवर 'यूज अँड थ्रो' राजकारणाचा आरोप

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकाही केली. भाजप 'यूज अँड थ्रो'चे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांबाबत समोर आलेल्या कथित गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

नाशिकच्या आदिवासी गावातून थेट कॉमनवेल्थच्या सुवर्णपदकापर्यंत; दिलीप गावितच्या जिद्दीची कथा
NEET आंदोलनानंतर काय घडलं? अभिजीत दीपके याच्या आई-वडिलांनी केला मोठा गौप्यस्फोट