
मावळ: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर, खासदार सुप्रिया सुळे तातडीने घटनास्थळी दाखल होत मदतीसाठी पुढे सरसावल्या. स्थानिक प्रशासन, आपत्ती निवारण पथक आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि बचावकार्यात अधिक गती देण्यासाठी तातडीचे निर्देश दिले.
सुळे यांनी जखमी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याशी सुसंवाद साधला आणि त्यांना मानसिक आधार दिला. तसेच, ज्यांचे नातेवाईक अजूनही बेपत्ता आहेत, अशा कुटुंबीयांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “जखमींना त्वरित उपचार मिळावेत, बेपत्ता व्यक्तींचा शोध अधिक तीव्र गतीने घ्यावा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती संपूर्ण मदत पोहोचवावी,” असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबांचे सदस्य अजूनही बेपत्ता आहेत. त्यांच्याशी सुळे यांनी संवाद साधून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, मृत आणि जखमींची अधिकृत संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या घटनेवर आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली असून, “आता बोलण्याचा नव्हे, तर कृतीचा काळ आहे. अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि जखमींना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी,” असे ते म्हणाले.
आपत्ती निवारण पथके, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन पूल कोसळल्यानंतर त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून, नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि मदतकार्य गतिमान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सुळे यांनी प्रशासनाशी सतत संपर्क ठेवत मदत व पुनर्वसनाची कार्यवाही वेळेत पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कुंडमळा दुर्घटना ही केवळ पूल कोसळण्याची नाही, तर अनेक कुटुंबांच्या ह्रदयाचा ठोका चुकवणारी घटना आहे. अशा प्रसंगी लोकप्रतिनिधींची तत्काळ उपस्थिती, संवेदनशीलता आणि निर्णयक्षमता किती महत्त्वाची असते, याचे जिवंत उदाहरण सुळे यांनी घालून दिले आहे.