
पुणे : सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात पुणे शहराने पुन्हा एकदा देशाला दिशा दाखवली आहे. पीएमपीएमएल (PMPML) बससेवेच्या माध्यमातून पुण्यात स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा आदर्श ‘पुणेरी पॅटर्न’ उभा राहिला असून, देशातील सर्वात मोठा पर्यावरणस्नेही बस ताफा पुण्याकडे असल्याचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे.
सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसच्या वाढत्या वापरामुळे पीएमपीएमएलने सर्वसामान्य पुणेकरांचा प्रवास अधिक परवडणारा केला आहे. केवळ पाच, दहा आणि वीस रुपयांत शहरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत पीएमपीएमएलने नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा आर्थिक ताण कमी केला आहे. सध्या दररोज जवळपास दहा लाख प्रवासी या सेवेतून प्रवास करत आहेत.
नवीन वातानुकूलित, आरामदायी आणि आधुनिक बसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी झाला आहे. बसच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे गर्दीवर नियंत्रण आले असून फेऱ्यांची वारंवारताही वाढवण्यात आली आहे. विशेषतः महिला, विद्यार्थी, नोकरदार आणि कष्टकरी वर्गासाठी या सेवांचा मोठा फायदा होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी पीएमपीएमएलने ‘अटल बससेवा’ आणि ‘पुण्यदशम’ या दोन महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत.
अटल बससेवा – अवघ्या 5 रुपयांत 5 किलोमीटर प्रवास
पुण्यदशम बस – फक्त 10 रुपयांत शहरातील प्रमुख भागांत जलद प्रवास
स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि महात्मा गांधी बस स्थानक (पुलगेट) यांसह मध्य पुण्यातील 9 प्रमुख मार्गांवर पुण्यदशम बस धावत असून, प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे 2,000 बस कार्यरत आहेत. त्यामध्ये
1,328 सीएनजी बस
490 इलेक्ट्रिक बस
217 डिझेल बस
डिसेंबर 2025 अखेर डिझेल बस पूर्णपणे बंद करण्याचे धोरण राबवले जात असून, त्यामुळे शहरातील वायू प्रदूषणात मोठी घट होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारकडून पुण्यासाठी अजून 2,000 पर्यावरणपूरक बस मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये 1,000 सीएनजी आणि 1,000 इलेक्ट्रिक बस असणार आहेत. यामुळे पीएमपीएमएलचा पर्यावरणस्नेही ताफा आणखी मजबूत होणार आहे.
या निर्णयांमुळे पुण्यात प्रदूषण कमी होण्यासोबतच नागरिकांना वेगवान, स्वस्त आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पीएमपीएमएलच्या या परिवर्तनाला पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.