
पुणे : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. अशाच एका झालेल्या हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. होमुर्झच्या सामुद्रधुनीमध्ये एका जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर यांचं निधन झालं आहे. मूळचे पुण्याचे असलेले हेरंब हे हल्ला झालेल्या जहाजावर इंजिनिअर होते.
इराणकडून जहाजावर हल्ला, पुण्यातील हेरंब यांचा दुर्दैवी मृत्यू
हेमंत हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. एमव्हीजीएफएस गॅलेक्सी या मालवाहू जहाजावर ते काम करायचे. हे जहाज ओमानच्या हद्दीतून जात असताना त्यावर हल्ला झाला. जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रुमजवळ आग लागली. त्यावेळी हेरंब तिथेच इंजिन रुमजवळ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या जहाजात एकूण २४ जण होते. त्यापैकी ११ भारतीय होते. २४ पैकी २३ जणांना जहाजातून बाहेर काढण्यात आलं, त्यांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. पण हेरंब यांचा कुठेही शोध लागला नाही. हल्ल्यानंतर हेरंब बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांचं निधन झाल्याची माहिती ते काम करत असलेल्या कंपनीकडून देण्यात आली.
मृत्यूच्या काही मिनिटं आधी कुटुंबियांशी संपर्क
मध्यरात्री साडे तीन वाजता हेरंब काम करत असलेल्या जहाजावर हल्ला झाला. त्याआधी रात्री पावणे तीन वाजता हेरंब यांचं त्यांच्या कुटुंबियांशी पुण्यात फोनवरुन बोलणं झालं होतं. त्यांनी फोन ठेवला आणि पुढे साडे तीनला जहाजावर हल्ला झाला. हेरंब करमरकर मागील तीन महिन्यांपासून जहाजावर होते. ते लवकरच भारतात परत येणार होते. मात्र त्याआधीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ३० वर्षीय हेरंब यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. करमरकर असलेलं जहाज मर्चंट नेव्हीचं होतं, याचा काहीही संबंध इराण-अमेरिका युद्धाशी किंवा या दोन देशांच्या संघर्षाशी नव्हता. तरीदेखील यावर हल्ला करण्यात आला.
दरम्यान, अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने इराणच्या अनेक प्रमुख ठिकाणांवर ड्रोन हल्ले, मिसाईल अटॅक केले. तर दुसरीकडे इराणकडून अमेरिकेचे तळ, अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या आखाती देशांना टार्गेट केलं जात आहे. इराणकडून होमुर्झच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवरही हल्ला केला जात आहे. असाच हल्ला इराणकडून हेरंब करमरकर असलेल्या जहाजावर करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेरंब यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर भारताकडून इराण दूतावासाच्या उपप्रमुखांकडे या हल्ल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.