Maratha Reservation: जरांगे मराठ्यांसाठी लढले तर पोटात का दुखतं?, मराठा-ओबीसी वाद भाजपनेच लावला : संजय उर्फ बंडू जाधव

ओबीसी नेत्यांनी आजपर्यंत स्वत:च्या समाजासाठी अनेक लढे दिले, मग मनोज जरांगे मराठा समाजासाठी लढत असतील तर काय चुकलं? शिवसेना ठाकरेंच्या नेत्याचा सवाल

Rameshwar Gavhane | Published : May 29, 2024 10:00 AM IST

मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे. राज्यात मराठा ओबीसी वाद हा भाजप अन त्यांच्या नेतृत्वानेच लावला, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि परभणी लोकसभेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांनी केले. तसेच बीडमध्ये घडलेली घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी संजय जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. आजपर्यंत ओबीसींसाठी छगन भुजबळ, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेकांनी लढा दिला. सगळ्या समाजांनी रस्त्यावर उतरुन, सरकारवर दबाव आणून काही मागण्या मान्य करुन घेतल्या. त्यामध्ये मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी तसाच प्रयत्न केला तर पोटात दुखायचं कारण काय? प्रत्येकाला स्वत:च्या समाजासाठी गोष्टी मागण्याचा नैतिक अधिकार आहे. या गोष्टी मिळवण्यासाठी मराठा रस्त्यावर उतरला तर तो दोषी आहे का? मराठ्यांनी ओबीसीतून किंवा सगेसोयऱ्याचे आरक्षण मागणे चुकीचे आहे का? असा सवाल शिवसेनेचे उपनेते तथा परभणीतील उमेदवार संजय जाधव यांनी भाजपसह महायुतीच्या नेत्यांना विचारला.

यावेळी बंडु जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच मॅन ऑफ द सिरीज राहतील. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात 35 जागा निवडून येतील, असा दावा बंडू जाधव यांनी केला.

Share this article