
Pimpri Chinchwad Election : महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला. मात्र या घोषणेनंतर काही तासांतच पिंपरी-चिंचवड शहरात पवार काका–पुतणे एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आल्याचं चित्र समोर आलं आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादींची एकत्रितरित्या झालेली ही पहिलीच चर्चा असल्याचं समोर आलं आहे. नाना काटे यांनी दावा केला की, काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना फोन करून पिंपरी-चिंचवडमध्ये मतविभाजन टाळण्याचा आणि शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता.
या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. शरद पवार राष्ट्रवादीने ‘तुतारी’ चिन्हावर उमेदवार उभे करायचे की केवळ ‘घड्याळ’ चिन्हावरच लढायचं, दोन्ही राष्ट्रवादींची स्वतंत्र आघाडी करायची की एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत घ्यायची, तसेच भाजपविरोधात कोणतं राजकीय समीकरण अंतिम करायचं, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाना काटे आणि सुनील गव्हाणे यांनी ही बैठक अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठांच्या सूचनेनुसार घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निवडणूक रणनीती स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलं की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत. “जर आम्ही एकत्र लढलो, तर त्याचा फायदा विरोधकांना होईल. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात, मात्र मैत्रीपूर्ण लढत देतील,” असं फडणवीस म्हणाले.
राज्यात बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असून, महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत असेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना आमनेसामने होते, मात्र महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र दिसणार आहेत.
मतदारयादीतील कथित घोळावरून विरोधकांनी सातत्याने निवडणूक आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “थोड्याफार प्रमाणात मतदारयादीत घोळ असतो आणि तो आम्हीही दाखवून दिला आहे. मात्र त्यामुळे निवडणुका घ्यायच्या नाहीत, हा विचार चुकीचा आहे.” पुढील काळात SIR प्रक्रियेमुळे घोळ कमी होतील, तसेच भविष्यात मतदारयाद्या **ब्लॉकचेनवर** टाकल्यास हे प्रश्न पूर्णपणे सुटू शकतील, असंही त्यांनी सांगितलं.