
मुंबई : राज्याच्या राजकारणासह शिक्षण क्षेत्रासाठी आजचा दिवस दुःखद ठरला आहे. पद्मश्री, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म झाला. त्यांनी यांनी कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला. ते कोल्हापूरचे महापौर, पन्हाळा मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांनी त्रिपुरा (2009-2013) आणि बिहार (2013-2014) या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. काही काळ त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले. त्यांच्या नावाने देशभरात अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे उभी राहिली. उच्च शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X bj श्रद्धांजली अर्पण करत, "त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक द्रष्टा नेता, महान शिक्षणमहर्षी आणि दिलदार मार्गदर्शक गमावला आहे. ईश्वर डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व पाटील परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना! डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!" अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे महान शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आणि शैक्षणिक विश्वावर शोकाकळा पसरली आहे.
केवळ संस्था उभ्या न करता, 'Academic Excellence' आणि 'Holistic… pic.twitter.com/ZRR2YsfkfX— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 4, 2026