
NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान एक मोठा आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा दावा समोर आला आहे. एनसीपी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखातून विलिनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवारांकडे देण्याचा निर्णय आमचाच होता, असे स्पष्ट केले. या विधानामुळे दोन्ही गटांमधील हालचालींना आणि राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी Sunetra Pawar यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. जरी Sharad Pawar यांनी सार्वजनिकरित्या विलिनीकरणाच्या चर्चांपासून स्वतःला दूर ठेवले असले, तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
साप्ताहिकातील लेखात शशिकांत शिंदे यांनी नमूद केले की, विलिनीकरणानंतर पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आधीच झाला होता. मात्र त्यांच्या निधनामुळे ते स्वप्न अपूर्ण राहिले. “दादांचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे त्यांनी लेखात म्हटले आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर खुद्द शरद पवार यांनी 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असे विधान केल्याने राजकीय वातावरण तापले होते. याच मुद्द्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणासंदर्भात पुरावे असल्याचा दावा केला होता. त्यावर दुसऱ्या गटातील नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी खुले आव्हान दिले.
राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष आणि विलिनीकरणाच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आता शशिकांत शिंदे यांच्या दाव्यावर अजित पवार गटातील नेते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.