
Maharashtra : लोकसभा ते पालिका निवडणुकीपर्यंतच्या यश-अपयशाचा आढावा घेत शिवसेनेत संघटनात्मक बदलांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर अनेक जिल्ह्यांत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. विशेषतः पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे निरीक्षण समोर आले आहे. यावरून शिंदेंनी संबंधित 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचल्याची माहिती आहे.निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे मंत्रिमंडळात बदल करण्याचा विचार सुरू असून अकार्यक्षम मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
शिंदेंनी पक्षातील सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना मजबूत करण्यासाठी दौरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निवडणुकीत कुठे आणि का कमी पडलो याची सखोल कारणमीमांसा करण्यावर भर देण्यात येणार आहे.पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर नव्या रणनीती आखण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे सूत्र सांगतात.
पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या सेनेच्या मंत्र्यांसाठी ‘लिटमस टेस्ट’ मानल्या जात होत्या. शिंदेंनी निवडणुकीपूर्वीच कामगिरीवर आधारित निर्णय घेतला जाईल, असा इशारा दिला होता. जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला असला तरी अपेक्षित कामगिरी झाली नसल्याने काहींना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीपूर्वी मंत्र्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर वगळता इतर भागांत अपेक्षित यश मिळाले नाही. जागावाटपाच्या चर्चांमध्ये शिवसेनेला मर्यादित जागा मिळाल्याची चर्चा होती. तसेच काही ठिकाणी घराणेशाहीच्या आरोपांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचेही बोलले जाते. अनेक दिग्गज नेत्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा सामना करावा लागल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचे चित्र आहे.याच पार्श्वभूमीवर मुंबईत पक्षाला बसलेला फटका गंभीर मानला जात आहे.