
Maharashtra Weather : महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम काही भागांवर होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
मुंबई शहरात काल उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. आज मात्र कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरही उकाडा वाढलेला असून रत्नागिरी जिल्ह्यात ३५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान विदर्भातील अमरावती जिल्ह्यात नोंदले गेले असून ते ३५.८ अंश सेल्सिअस होते, जे सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी अधिक आहे.
पुणे जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सिअस राहणार आहे. लोहगाव येथे किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस असून कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यात आज कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात ३५.४ अंश सेल्सिअस तर चंद्रपूरमध्ये ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे १३.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
रविवारी राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे राहून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष अडचण येणार नाही. मात्र १७ ते १८ फेब्रुवारीदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.