Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : 10 जागांसाठी रणधुमाळी, महायुतीचा वरचष्मा; उमेदवारांची नावे चर्चेत

Published : Apr 22, 2026, 11:30 AM IST
vidhan bhavan

सार

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 12 मे रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी महायुतीचे संख्याबळ मजबूत असल्याने 8 जागांवर विजयाची शक्यता, तर महाविकास आघाडी एका जागेपुरती मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 9 नियमित जागा आणि 1 पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून 12 मे 2026 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी विरुद्ध विरोधक – संख्याबळाचे गणित स्पष्ट

विधानसभेतील विद्यमान संख्याबळ पाहता सत्ताधारी महायुती (भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट) यांचे पारडे जड दिसत आहे. भाजपकडे 131, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी 40 आमदार असल्याने एकूण बलाबल मजबूत आहे. त्यामुळे महायुतीचे 8 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 असल्याने त्यांना केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता आहे.

उमेदवारांच्या नावांची चर्चा

निवडणुकीची घोषणा होताच सर्व प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. भाजपकडून माधवी नाईक, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर यांसारखी नावे चर्चेत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे, शायना एनसी आणि बच्चू कडू यांची नावे पुढे येत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झिशान सिद्धिकी, आनंद परांजपे यांची चर्चा असून ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे, विनायक राऊत यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे अंतिम यादीत कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

या निवडणुकीची अधिसूचना 23 एप्रिल रोजी जारी होणार असून 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 मे रोजी अर्जांची छाननी होईल, तर 4 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 12 मे रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 13 मेपर्यंत पूर्ण होईल.

कार्यकाळ संपणारे आमदार आणि पोटनिवडणूक

या निवडणुकीत विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपत असून त्यात उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ नियमित प्रक्रिया नसून राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

राजकीय रंगत वाढणार, समीकरणे बदलण्याची शक्यता

विधान परिषद निवडणुकीमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. महायुती आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असताना, महाविकास आघाडी प्रतिष्ठेची लढत देणार आहे. आगामी काळात उमेदवारांची अधिकृत घोषणा, अंतर्गत नाराजी आणि संभाव्य क्रॉस-व्होटिंग यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ashok Kharat Health : भोंदूबाबा अशोक खरातची कोठडीत प्रकृती बिघडली; SIT चौकशीदरम्यान अचानक तब्येत खालावल्याने खळबळ
Mumbai-Pune Expressway : मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर या २ दिवशी ‘ट्रॅफिक ब्लॉक’, पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना