
Maharashtra Rajya Sabha Election : महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील एका जागेसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली चर्चा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर एकमत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यसभेच्या या जागेसाठी सुरुवातीला आघाडीत काही प्रमाणात मतभेद असल्याची चर्चा होती. मात्र शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर चित्र बदलले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याशिवाय काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशीही संवाद साधण्यात आल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळाल्यास उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेत अनुभवी नेतृत्व असणे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे मत आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 16 मार्च रोजी मतदान होणार असून, महाराष्ट्रातील सात जागांपैकी महाविकास आघाडीला त्यांच्या संख्याबळानुसार एक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे.
गेल्या अनेक दशकांपासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांचा सध्याचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपत आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ आघाडीला पुढेही मिळावा, या हेतूने त्यांना पुन्हा संधी देण्याचा विचार पुढे आला आहे. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आता राजकीय वर्तुळात लागली आहे.