Maharashtra Rain : महाराष्ट्रात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने जोर धरला असून मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा यांसह कोकण-घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा बसला आहे. पुढील ३-४ दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रात्रभर जोर धरला आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि 50 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, लोणावळा, खंडाळा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथा या भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.
26
पुढील तीन दिवसांचा इशारा
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील तीन तासांत मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. यासोबत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मंत्रालयाकडूनही याबाबत इशारा जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस पुन्हा अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
36
ऑरेंज आणि यलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरू राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भापासून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा परतीचा पाऊस असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत पाऊस हळूहळू कमी होईल असा अंदाज आहे.
56
बीड जिल्ह्यात धरणाचे दरवाजे उघडले
मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याची आवक वाढल्याने प्रशासनाने सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठी कोणीही जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
66
नाशिक-हिंगोली जिल्ह्यांतील परिस्थिती
नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव आणि ग्रामीण भागात जोरदार पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. मनमाडच्या आठवडी बाजारावरही पावसाचा फटका बसला. हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर रमना गावात ओढ्याच्या पुरात शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली. मात्र, एका तरुणाने जीव धोक्यात घालून शेतकऱ्याला वाचवलं. हा धाडसी प्रयत्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.