'सगळे चोर फडणवीसांकडेच', मनोज जरांगे पाटलांचा सोलापुरात हल्लाबोल

मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरु झाला असून यावेळी त्यांनी फडणवीस, भुजबळ आणि आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात झालेल्या गोळीबारासाठी त्यांनी फडणवीसांना जबाबदार धरले आहे.

Rameshwar Gavhane | Published : Aug 7, 2024 12:49 PM IST

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा बुधवारपासून सुरु झाला आहे. बुधवारी सोलापूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरु झाली आहे. या रॅलीतून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘जिल्ह्यातील मराठ्यांनी राज्याला दाखवून दिले आम्ही कमी नाही, आपल्याला येड्यात काढत होते. आता कार्यक्रम झाला, काही जण बघत नसतील, त्यांच्या डोळ्यात चटणी गेली असेल. सरकारला वाटतं राज्यातील मराठे एक नाहीत, आपल्यात दुष्मन्या पेरल्यात. आपल्या अस्तित्वाला हात घालण्याचे काम यांनी केले आहे.’ अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

आता यापुढे बोलला तर धुलाई करणार’, जरांगेंचा राणेंना इशारा

‘कोकणातील एक जण भीतडकडे बघतो, चांगला होता आधी बाबा. मी त्याला कधीच म्हटलं नाही मराठवाड्यात येऊ नको. उगाच जाणून बुजून भांडण का करता? ते म्हणाले बघून घेतो. मी करडे घातले असतात, काय बघतो बाबा? आता यापुढे बोलला तर धुलाई करणार’, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी राणेंना दिला आहे.

छगन भुजबळ पुन्हा मनोज जरांगे पाटलांच्या रडारवर

‘छगन भुजबळ 15 दिवसांपासून कुठे गेले माहिती नाही. भुजबळ कोणत्याही मतदारसंघात जाईल तो नेता पाडायचा. मराठ्यांचे वाटोळ करणाऱ्यांना सुट्टी नाही. आधी पाडा म्हंटलं, आता नाव घेऊन पाडा म्हणणार. छगन भुजबळ आता बोगस समितीचा अध्यक्ष आहे, बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ आहे’, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांवर मनोज जरांगे पाटलांचा निशाणा

‘देवेंद्र फडणवीसना का बोलतो ते सांगतो. अंतरवालीमध्ये महिलांवर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात लोक किंचाळत होते, यांचा आक्रोश ऐकायला कुणी नव्हते. फोडलेलं डोकं आणि डोक्यात गेलेल्या गोळ्या निघत नाहीत. मोठ्या डॉक्टरकडून गोळ्या निघत नाहीत, त्यांचा जीव काय म्हणत असेल? देवेंद्र फडणवीसांनी हल्ल्याच्या बाजूने बोललं पाहिजे, पण ते पोलिसांच्या बाजूने बोलले’, असं जरांगे म्हणाले.

फडणवीसांचे ऐकून दरेकरांचे अभियान सुरू

‘प्रवीण दरेकरांनी फडणवीसांचे ऐकून अभियान सुरू केले, हे अभियान नाही षडयंत्र आहे. मराठ्यांच्या जेवणात माती नका मिसळवू. सगळे चोर फडणवीसकडेच, छोटे चोर, दरोडेखोर, पाकिटमार यांच्याकडेच’, असा आरोप जरांगेंनी केला आहे.

'मी कुणाचा आहे याचा मेळ यांना लागणारच नाही'

‘आंबेडकर म्हणाले माझं आणि फडणवीसांचे भांडण नकली आहे, पुढे म्हणाले, मी शरद पवारचा आहे. यांना मेळच लागेना मी कुणाचा आहे. माझा मालक फक्त मराठा समाज आहे, मी कुणाचा आहे याचा मेळ यांना लागणारच नाही’, असा पलटवार मनोज जरांगेंनी केला आहे.

Share this article