
Maharashtra Heatwave : महाराष्ट्रात होळीपूर्वीच उन्हाचा कडाका वाढू लागला असून ठाणे जिल्हा आणि परिसरात तापमानाने मोठी उसळी घेतली आहे. हवामानातील अचानक बदल, उष्ण व दमट वातावरण आणि वाढती आर्द्रता यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवत आहे. हवामान विभागाने सोमवार, 16 फेब्रुवारी रोजी उष्णतेची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करत काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई महानगर प्रदेशात पुढील काही दिवस तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे दुपारच्या वेळेत उकाडा अधिक जाणवेल. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात आज आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार असून कडक उन्हाचा प्रभाव जाणवेल. किमान तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत उष्माघाताचा धोका वाढू शकतो. कल्याण-डोंबिवली परिसरातही उष्ण व कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. येथे कमाल तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंशांच्या आसपास राहील. मध्यम आर्द्रतेमुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो.
ग्रामीण भागातही उष्ण व दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंशांपर्यंत जाऊ शकते. सकाळी आणि रात्री किंचित गारवा जाणवेल; मात्र दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका तीव्र असेल.
पुढील काही दिवस उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.