
Maharashtra SSC-HSC Board Results : शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वर्षभराच्या मेहनतीनंतर मिळालेली सुट्टी जरी आनंद देणारी असली, तरी मनात निकालाची धाकधूक कायम असते. अशातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान राज्यभरात 12वी आणि 10वीच्या परीक्षा पार पडल्या. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान झाली, तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान घेण्यात आली. परीक्षा संपून महिन्याहून अधिक कालावधी उलटला असून आता विद्यार्थी आणि पालक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. राज्यातील सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांचे पेपर तपासून झाले असून सध्या गुणसंकलन आणि रिपोर्टिंगचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस 12वीचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दहावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी देखील वेगाने सुरू असून मोठ्या प्रमाणात काम पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर होऊ शकतो. त्यामुळे एप्रिल आणि मे महिने विद्यार्थ्यांसाठी निर्णायक ठरणार आहेत.
विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल:
https://mahresult.nic.in
https://hscresult.mkcl.org
https://hscresult.mahahsscboard.in
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा काळ
निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असून पुढील शिक्षणाची दिशा ठरवणारा आहे. अधिकृत तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी अपडेट्सवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.