
कल्याण : कल्याण पूर्वेतील नागरिकांसाठी पुढील काही दिवस वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. पुणे लिंक रोडवरील खडवली नाका परिसरातील जुना पूल हटवून तेथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात ठाणे शहर वाहतूक शाखेने अधिकृत अधिसूचना जारी केली असून, हे बदल 22 जानेवारीपासून लागू होणार आहेत आणि पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहेत.
पुलाच्या पाडकामामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे लिंक रोडवरून विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक किंवा श्रीराम चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना आनंद दिघे चौक आणि स्मशानभूमी चौक येथे प्रवेश दिला जाणार नाही. ही वाहने आनंद दिघे उड्डाणपूल आणि सम्राट चौक मार्गे वळवली जाणार आहेत. तसेच श्रीराम चौक व विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरातून खडवली नाका किंवा चाकण नाक्याकडे जाणाऱ्या वाहनांना श्रीराम चौकात थांबण्यास किंवा प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
या मार्गांऐवजी वाहतूक शाखेने पुढील पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार
शांतीनगर (उल्हासनगर)
सम्राट चौक
हलकी वाहने आणि कल्याण पूर्वेतील स्थानिक रहिवाशांसाठी कोळशेवाडी पोलीस स्टेशन परिसर, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक (पूर्व) आणि अंतर्गत रस्त्यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच काटेमानवली पुलाखालून हनुमान नगर, चिंचपाडा रोड आणि शंभर फूट रोड हे मार्गही खुले राहणार आहेत.
श्रीराम चौकातून कल्याण पूर्वेकडे येणाऱ्या वाहनांसाठी महिला उद्योग केंद्राजवळून विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या बाजूने किंवा खडवलीकडे जाणारा मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे.
या सर्व बदलांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी केडीएमसी आणि ठाणे शहर पोलीस प्रशासनाकडून दिशा दर्शक फलक लावले जाणार आहेत. हे वाहतूक नियम 22 जानेवारी रोजी रात्री 12:01 वाजल्यापासून लागू होतील. मात्र पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर तसेच इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे. वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.