
Maharashtra Tourist Return in Mumbai : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे देश-जगभरात पडसाद उमटत आहेत. दुसऱ्या बाजूला हल्ल्यानंतर श्रीनगर विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना मुंबईत सुखरुप आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. यानंतर आज (24 एप्रिल) श्रीनगरहून महाराष्ट्रातील 83 प्रवासी परतणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म फेसबुकवर श्रीनगर येथून येणाऱ्या प्रवाशांच्या नावाची यादी शेअर केली आहे. मोहोळ यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “श्रीनगरहून मुंबईकडे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना घेऊन येणाऱ्या पहिल्या विमानातील पर्यटकांची यादी अंतिम करण्यात आली असून यात 83 प्रवाशी गुरुवारी महाराष्ट्रात परत येणार आहेत.”
महाराष्ट्रातील पर्यटक सुखरुप घरी परतण्यासाठी अन्य एका विमानाची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी लागणारा खर्च राज्य सरकार करणार असल्याचे सांगितले जात आहे. याआधी बुधवारी (23 एप्रिल) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगर विमानतळवरील प्रवाशांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सर्व पर्यटकांना काळजीपूर्वक आणि सन्मानाने मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
पहलगाममध्ये नक्की काय घडले?
22 एप्रिलला पहलगाम येथील बैसरन येथे अज्ञात बंदूकधार्यांनी निष्पाप नागरिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात जवळजवळ 25 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात-विदेशात संताप व्यक्त केला जात आहे. गोळीबारात तीन शासकीय सेवेतील तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. यामधील संतोष जगदाळे आणि कौस्तूभ गानबोटे यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले आहे.