
मुंबई: पावसाने आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर परत एकदा दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागामध्ये उकाड्याला सुरुवात झाली होती पण आता पावसाने गरमी कमी झाली आहे. पाऊस सुरु झाल्यामुळे नागरिकांची चिंता मिटून गेली. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. सुरुवातीच्या काळात पिकांना पावसाची आवश्यकता होती आणि पाऊस न झाल्यामुळं शेतकरी चिंतेंत होते पण आता जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळं पिकांना टवटवीतपणा आला आहे. किनारपट्टीलगतच्या भागात आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूर येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, इथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस होईल त्यानंतर पुढचे तीन दिवस पावसाचा जोर कमी असेल. पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केला असून पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.