
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमावर गंभीर आरोप केले आहेत. हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नसून, राहुल गांधींना 'री-लाँच' करण्यासाठी आणि वाद निर्माण करण्याच्या हेतूने आखलेली एक राजकीय योजना होती, असं फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा तो प्रमोट करण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना ३०,००० रुपये दिले जात असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला.
फडणवीस म्हणाले, "आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, लोकांना हा एक इव्हेंट असल्याचं सांगण्यात आलं. त्यांना कार्यक्रमाला येण्यास सांगण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना पैसे दिले जातील, असं आश्वासन देण्यात आलं." त्यांनी पुढे सांगितलं की, इन्फ्लुएन्सर्सना यासाठी ३०,००० रुपये दिले जात होते.
फडणवीसांनी पुढे सांगितलं की, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा नैसर्गिक मेळावा नव्हता, तर तो एका इव्हेंटप्रमाणे 'मॅनेज' करण्यात आला होता. त्यांच्या मते, या कार्यक्रमासाठी फक्त काँग्रेसशी संबंधित कॉलेजमधील विद्यार्थिनींनाच उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. इतकंच नाही, तर उपस्थित राहणाऱ्यांना कार्यक्रमातील नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त सकारात्मक बाबींवरच बोलण्यास प्रोत्साहन दिलं जात होतं. अशा मेळाव्याला खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा आवाज म्हणता येईल का? असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.
फडणवीसांनी या कार्यक्रमाचा संबंध आदल्या दिवशी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP) मध्ये झालेल्या एका घटनेशी जोडला. काँग्रेसने त्या संस्थेत गोंधळ घातला आणि विद्यार्थ्यांना मारहाण केली, असा आरोप त्यांनी केला. "या कार्यक्रमाच्या आधी, त्यांनी काल दुसरा कार्यक्रम आयोजित केला. ज्याप्रकारे काँग्रेसने COEP मध्ये गोंधळ घातला, विद्यार्थ्यांना मारहाण केली, हा एक पूर्वनियोजित कट होता," असा आरोप फडणवीसांनी केला.
काल, राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल गेटबाहेर ABVP कार्यकर्ते आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या सदस्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी हॉस्टेलच्या गेटबाहेर ABVP कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली आणि निषेध म्हणून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या वादात सामील असलेल्या अनेकांना ताब्यात घेतलं.
फडणवीसांनी या रणनीतीची तुलना चित्रपट हिट करण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करण्याच्या प्रकाराशी केली. "एखादा सिनेमा हिट करण्यासाठी जसा वाद निर्माण करावा लागतो, तसाच हा वाद त्यांनी मुद्दाम घडवून आणला," असं ते म्हणाले.
काँग्रेसने विद्यार्थ्यांशी संवाद म्हणून सादर केलेल्या राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मात्र, फडणवीसांनी या कार्यक्रमाच्या खरेपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करत हा विद्यार्थ्यांचा खरा आवाज नसल्याचं म्हटलं आहे.
यापूर्वी, पुण्यातील कार्यक्रमाची घोषणा करताना राहुल गांधी म्हणाले होते की, हा कार्यक्रम मुलींना त्यांचे विचार मांडण्यासाठी एक विशेष व्यासपीठ देईल आणि त्यांचा आवाज संपूर्ण देशात ऐकला जाईल. "२२ ऑगस्ट रोजी 'छात्रों की गूंज' पुण्यात येत आहे - आणि यावेळी हा कार्यक्रम फक्त मुलींसाठी असेल. आता मुली बोलतील आणि देश ऐकेल," असं ते म्हणाले होते.