
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचा आणि अभेद्य दुर्गबांधणीचा वारसा आता अधिकृतपणे 'जागतिक वारसा' (World Heritage) म्हणून जगाच्या नकाशावर कोरला गेला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील युनेस्को (UNESCO) मुख्यालयात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात, महाराष्ट्राच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देणारे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी स्वीकारले.
११ जुलै २०२५ रोजी युनेस्कोच्या ४७ व्या अधिवेशनात ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने शिवकाळातील किल्ल्यांच्या साखळीला जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले होते. या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर आज त्याचे मानांकन-पत्र प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या हाती आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांचा समावेश आहे.
गडकोट: रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर.
जलदुर्ग: सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी.
दक्षिण दिग्विजय: जिंजी (तमिळनाडू).
फेब्रुवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाने पॅरिसमध्ये केलेल्या तांत्रिक मांडणीला मोठे यश मिळाले आहे. हे प्रमाणपत्र स्वीकारताना मंत्री आशिष शेलार भावूक झाले. ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि मराठा साम्राज्याचा वारसा हा केवळ महाराष्ट्राचा नाही, तर संपूर्ण जगाचा आदर्श आहे. हा सन्मान स्वीकारताना प्रत्येक शिवप्रेमीचा ऊर अभिमानाने भरून येईल." या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाचे आभार मानले.
पॅरिस दौऱ्यादरम्यान मंत्री शेलार यांनी युनेस्को मुख्यालयात नुकत्याच बसवण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने हा पुतळा महाराष्ट्र सरकारने युनेस्कोला भेट दिला आहे. समता, न्याय आणि बंधुतेचा विचार देणाऱ्या महामानवाचे स्मारक आता युनेस्कोच्या जागतिक व्यासपीठावर दिमाखाने उभे आहे.
पर्यटनाला चालना: जागतिक वारसा दर्जा मिळाल्यामुळे या किल्ल्यांकडे विदेशी पर्यटकांचा ओढा वाढेल.
संवर्धनासाठी निधी: युनेस्कोच्या निकषांमुळे किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान आणि निधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
इतिहासाची ओळख: शिवरायांची 'गनिमी कावा' ही युद्धनीती आणि स्थापत्यशास्त्र जागतिक स्तरावर अभ्यासाचा विषय बनेल.