
मुंबई: आपल्या गावाला केंद्र आणि राज्य सरकारकडून किती पैसा मिळतो? तो पैसा कोणत्या कामासाठी वापरला जातो? याबद्दल तुमच्या मनातही शंका आहे का? अनेकदा ग्रामपंचायतीमध्ये लाखो-कोटींचा निधी येतो, पण माहितीअभावी सामान्य नागरिकांना त्याबद्दल काहीच कल्पना नसते. आता मात्र 'डिजिटल इंडिया'मुळे तुमच्या ग्रामपंचायतीचा संपूर्ण हिशोब तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर पाहू शकता.
ग्रामपंचायतीला प्रामुख्याने तीन मार्गांनी निधी मिळतो.
१. केंद्र सरकारच्या योजना: १५ वा वित्त आयोग, मनरेगा (MGNREGA), स्वच्छ भारत मिशन आणि प्रधानमंत्री आवास योजना.
२. राज्य सरकारचे अनुदान: रस्ते, पाणीपुरवठा आणि स्थानिक विकासकामांसाठी मिळणारा निधी.
३. जिल्हा परिषद निधी: जिल्हा स्तरावरून मिळणारी विशेष अनुदाने.
गावाची लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार हा निधी काही लाखांपासून ते थेट १ कोटी रुपयांपर्यंत असू शकतो.
सरकारने ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी eGramSwaraj हे पोर्टल आणि ॲप सुरू केले आहे.
१. पोर्टलवरून माहिती कशी पाहायची?
केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
तेथे 'Planning' किंवा 'Accounting' विभागात जाऊन तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत निवडा.
तुम्हाला त्या वर्षाचा विकास आराखडा (GPDP), मंजूर कामे आणि खर्च झालेला निधी याची सविस्तर माहिती दिसेल.
२. 'eGramSwaraj' मोबाईल ॲप
जर तुम्हाला पोर्टल वापरणे कठीण जात असेल, तर प्ले-स्टोअरवरून eGramSwaraj ॲप डाऊनलोड करा. यात तुम्ही तुमच्या गावातील सुरू असलेली कामे, पूर्ण झालेली कामे आणि त्यासाठी झालेला खर्च फोटोसह पाहू शकता.
केवळ माहिती पाहून उपयोग नाही, तर ग्रामसभेत सहभागी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
ऑनलाईन मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्ही ग्रामसभेत निधीच्या वापराबाबत प्रश्न विचारू शकता.
तुमच्या गावात खरोखर ते काम झाले आहे का? याची खातरजमा करू शकता.
यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसतो आणि गावाबद्दलची प्रशासकीय जबाबदारी वाढते.
तुमच्या गावाला मिळालेला निधी हा तुमच्या हक्काचा पैसा आहे. त्याचा योग्य विनियोग होतोय की नाही, हे पाहणे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे.