बदलापूर अत्याचार: मुलींवर 15 दिवसांपासून अत्याचार, समितीचा धक्कादायक निष्कर्ष

बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चौकशी समितीचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. निष्कर्षानुसार, मुलींवर गेल्या 15 दिवसांपासून अत्याचार होत होते आणि त्यांच्या गुप्त भागांना गंभीर दुखापत झाली आहे. 

Rameshwar Gavhane | Published : Aug 24, 2024 4:54 AM IST

बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केलीय. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्रभर निदर्शन करण्यात येत आहे. असे असतानाच आता बदलापूर घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. या समितीच्या प्राथमिक निष्कर्षानुसार बदलापूरमधील त्या अल्पवयीन मुलींवर 15 दिवसांपासून अत्याचार होते.

अहवालात नेमके काय आहे?

1. त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला जवळपास एक इंच इजा झाली आहे.

2. गेल्या 15 दिवसांत अल्पवयीन मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता आहे.

3. 1 ऑगस्टला शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी न तपासता भरती करण्यात आली होती.

4. त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्राशिवाय सहज प्रवेश होता.

5. त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारशीने हे शोधण्याची गरज आहे.

6. हे प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेला असून येत्या सात दिवसांत उत्तरे मागवली जाणार आहेत.

7. शाळा प्रशासन तब्बल 48 तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले होते.

8. तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही.

9. पीडितेवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला 12 तास लागले.

बदलापूर अत्याचार प्रकरण नेमकं काय आहे?

बदलापूरमध्ये एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संबंधित शाळेच्या बाहेर येऊन आंदोलन केले होते. तर काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोखून धरल्या होत्या. सकाळी चालू झालेले हे आंदोलन संध्याकाळापर्यंत चालले होते. या प्रकरणातील आरोपील आत्ताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जनतेने केली होती. शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने हे घृणास्पद कृत्य केले होते. त्याच्यावर लहान मुलांना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

आणखी वाचा :

Share this article