Babanrao Lonikar Speech : 'मते नाही दिलीत तर निधीला फुली!', बबनराव लोणीकर यांचे गावकऱ्यांना खुले इशारे

Published : Jun 22, 2025, 10:04 PM IST
babanrao lonikar

सार

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यातील बोरगाव येथे मतदारांना इशारा दिला आहे की जर त्यांनी भाजपला मतदान केले नाही तर त्यांना निधी मिळणार नाही. लोणीकर यांनी मतदारांना 'फुली' मागितल्या आणि निधी दिला असल्याचे सांगितले.

जालना: "मी ५ वर्षांतून एकदाच तुमच्याकडे येतो तेही फुली मागायला! ती दिली नाही तर गावाला निधी फुलीच!" असं वक्तव्य करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी थेट मतदारांना इशारा दिला आहे. जालना जिल्ह्यातील बोरगाव येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी गावकऱ्यांच्या मतदानावर नाराजी व्यक्त करत, भविष्यकाळात निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात असा संकेत दिला.

“८ कोटी रुपये दिलेत... तरीही मतांमध्ये मागे कसा?”

लोणीकर म्हणाले, "तुमचं गाव भाजपचं बालेकिल्ला होतं. ५०-६० टक्के मतदानाची अपेक्षा होती. म्हणूनच तुम्हाला ८ कोटींचा निधी देऊन ठेवला. पण मतदान झालं कमी. कुणी मशालीकडे, कुणी टीव्हीकडे गेलं... गाव पांगलं!" तसेच त्यांनी चक्क उपहास करत विचारले, "मी इतका निधी देतो आणि तरी बबनराव मागे कसा?"

कार्यकर्ते नाराज, गावाने 'धोका' दिला; खंत व्यक्त

बबनराव लोणीकर यांनी भाषणात पुढे सांगितलं की, "दिगंबरराव, खैरे, अशोकराव पंचायत समिती सगळेच नाराज आहेत. म्हणाले, 'गावाने धोका दिला.' मग विचारलं. निधी कॅन्सल करू का? पण म्हणाले, 'भाऊ, एवढं जाऊ द्या.'"

"एकदा चव पाहीन, तीनदा पाहीन, मग फुली मारेन!"

गावकऱ्यांना उद्देशून त्यांनी म्हटलं, "मी पहिल्यांदा फुली मागितली, दुसऱ्यांदा पैसे दिले, तिसऱ्यांदा ही वेळ आली तर म्हणेन फुली मारा. कारण शेवटी तुमच्याच गावात मी सभामंडप दिला, फिल्टर पाणी दिलं, डांबर रस्ते केले. डीपी जळाली की फोन माझ्याकडेच येतो."

"मला दिलंत नाही तरी मी देत राहीन, पण एक मर्यादा असते"

भाषणाच्या शेवटी लोणीकर म्हणाले, "मी ३३० गावांना डांबर रस्ते दिले, ज्या वेळेस ही ४४ गावं माझ्या मतदारसंघात आली तेव्हाच विकास दिला. तुम्ही मतं दिलीत की नाही, हे वेगळं. पण मी देत राहीन. मात्र एक मर्यादा असते. एकदा, दोनदा, तीनदा निधी देईन... त्यानंतर फुली मारेन. ही वेळ येऊ देऊ नका!"

विरोधकांकडून टीकेची शक्यता

या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विरोधकांकडून या भाषणावर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. मतदान हे अधिकार असून त्यासाठी दबाव टाकणं हा लोकशाहीचा अपमान आहे, असा सूर टीकाकारांमध्ये उमटू शकतो.

निधी म्हणजे 'फुलीचं बक्षीस'?

राजकीय प्रतिनिधी मतदारांना फक्त निवडणुकीपुरते आठवतात का? निधी हे विकासासाठी असतं की निवडणुकीच्या बदल्यातच मिळणारं राजकीय बक्षीस? बबनराव लोणीकर यांच्या या वक्तव्यामुळे हे प्रश्न पुन्हा समोर आले आहेत.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!
कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो