
सातारा: कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दणदणीत पराभव करून चर्चेत आलेले आमदार अतुल बाबा भोसले यांना भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपने नुकत्याच घोषित केलेल्या राज्यातील ५८ जिल्हाध्यक्षांच्या यादीत भोसले यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांना संघटनात्मक ताकद वाढवण्याचे मोठे बळ देण्यात आले आहे.
भोसले यांची ही निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष विश्वासाची पावती मानली जात आहे. भोसले यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून यशस्वी कामगिरी केली होती, त्याच्या पार्श्वभूमीवरच ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
२०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा अपयश आल्यानंतर, २०२४ मध्ये भोसले यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कराड दक्षिण मतदारसंघातून विजय मिळवत भाजपसाठी ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयामुळे कराडमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले.
अतुल भोसले यांचा राजकीय प्रवास विविध टप्प्यांतून समृद्ध झाला आहे:
२०१५ मध्ये भाजपचे प्रदेश चिटणीस म्हणून जबाबदारी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष (२०१७-२०१९)
कराड नगरपालिकेत भाजपचा पहिला नगराध्यक्ष निवडून आणण्याची कामगिरी
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये भाजपला यश
प्रदेश कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र व गोवा प्रचारक म्हणून यशस्वी सहभाग
या सर्व घडामोडींनी भोसले यांना फडणवीसांचे निकटवर्तीय नेते म्हणून ओळख दिली.
सातारा जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत असताना, पक्षश्रेष्ठींनी भोसले यांना निवडून राजकीय संदेश दिला आहे – पक्ष संघटनेची धुरा आता नव्या नेतृत्वाच्या हाती दिली जात आहे.
या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अतुल भोसले म्हणाले “पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. साताऱ्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी, विचारधारा घरोघरी पोहोचवणे, आणि भाजपला जिल्ह्यात अग्रस्थानी नेणे हे माझे ध्येय असेल.”
पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, संघटन कौशल्य, आणि पक्षातील दृढ निष्ठेमुळे अतुल भोसले हे साताऱ्यात भाजपचे नवे ‘फेस’ ठरले आहेत. जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांच्यावर दिलेली जबाबदारी भविष्यातील राजकीय समीकरणे ठरवणारी ठरू शकते.