
उन्हाळ्यात जास्वंदीच्या झाडाला भरपूर फुलं येतात. पण जर तुम्हाला संपूर्ण उन्हाळाभर झाड फुलांनी बहरलेलं हवं असेल, तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. बऱ्याचदा योग्य काळजी न घेतल्यामुळे जास्वंदीला फुलं येणं बंद होतं किंवा पानं किडलेली दिसू लागतात. यामागे कीटक, मुंग्या किंवा बुरशीचं कारण असू शकतं. यावर एक सोपा उपाय आहे. कापराची एक छोटी वडी कापडात बांधून एका काडीच्या मदतीने कुंडीत टांगून ठेवा. असं केल्याने तुमचं जास्वंदीचं झाड सुरक्षित राहील. चला, जाणून घेऊया झाडात कापूर ठेवल्याने काय फायदे होतात.
कापराच्या तीव्र वासामुळे मावा (aphids), डास आणि इतर लहान कीटक जास्वंदीच्या झाडापासून दूर राहतात. यामुळे जास्वंदीची पानं आणि कळ्यांवर कीड लागण्याचा धोका कमी होतो.
कापरामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. कुंडीच्या आसपास कापूर ठेवल्याने ओलाव्यामुळे येणारा कुबट वास आणि बुरशीची समस्या कमी होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कापूर कधीही कापडाशिवाय झाडात टांगू नका आणि तो पानांना चिकटणार नाही याची काळजी घ्या.
उन्हाळ्यात मुंग्यांचा त्रास खूप वाढतो. जर तुमच्या कुंडीत वारंवार मुंग्या येत असतील, तर कापराच्या वासाने त्या दूर पळून जातील. मुंग्या जास्वंदीची पानं खातात, ज्यामुळे झाडाचं नुकसान होतं.
कापराचा वास डासांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे बाल्कनीतून डासांना पळवून लावण्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या झाडात कापूर टांगू शकता. बागेत झाडांजवळ कापूर ठेवल्याने वातावरणही सुगंधित होईल.