
Relationship Advice : कोणतेही नाते असो प्रेमाचं, वैवाहिक, मैत्रीचं किंवा कौटुंबिक गैरसमज निर्माण होणं स्वाभाविक आहे. अनेकदा छोट्या गोष्टी मनात साठत जातात आणि त्याचाच मोठा वाद होतो. मात्र योग्य पद्धतीने संवाद साधला, तर हे गैरसमज अवघ्या काही मिनिटांत दूर करता येऊ शकतात. नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी वेळेपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. योग्य शब्द, शांत मन आणि थोडी समजूतदारी वापरली, तर नातं पुन्हा पूर्ववत होऊ शकतं.
गैरसमज दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांतपणे बोलणं. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्याला आणखी दुखावू शकतात. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या आणि मध्येच टोकू नका. शांत संवादामुळे समोरच्यालाही आपली भावना मोकळेपणाने व्यक्त करता येते आणि गैरसमजाचं मूळ कारण लगेच समोर येतं.
बर्याचदा आपण समोरची व्यक्ती काय विचार करत असेल, याचा अंदाज बांधतो आणि त्यातून गैरसमज वाढतात. कोणतीही गोष्ट मनात न ठेवता थेट प्रश्न विचारा. “मला असं वाटलं…” किंवा “तुझा अर्थ असा होता का?” अशा शब्दांत विचारल्यास संभाषण सकारात्मक दिशेने जातं आणि चुकीच्या कल्पनांना आळा बसतो.
समोरच्याला दोष देण्याऐवजी “मला असं वाटलं” किंवा “मला त्रास झाला” अशा वाक्यांचा वापर करा. यामुळे समोरची व्यक्ती बचावात्मक होत नाही. स्वतःच्या भावना स्पष्टपणे सांगितल्यास गैरसमज लवकर दूर होतात आणि नात्यात विश्वास वाढतो.
कधी कधी चूक आपली नसतानाही नातं वाचवण्यासाठी माफी मागणं गरजेचं असतं. माफी मागणं म्हणजे कमजोरी नाही, तर नात्याची किंमत ओळखणं आहे. प्रामाणिक माफीमुळे समोरच्याचं मन मोकळं होतं आणि तणाव काही मिनिटांत कमी होतो.
गैरसमज लांबवत ठेवल्यास ते अधिक गुंतागुंतीचे होतात. शक्य तितक्या लवकर त्या विषयावर चर्चा करा आणि तो संपवा. “हे नंतर पाहू” असं म्हणत गोष्ट टाळल्यास मनात कटुता साठते. थोडा वेळ काढून विषय शांतपणे सोडवला, तर नातं अधिक मजबूत होतं.