Psychology: आजकाल नाती टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरत नाही, तर आपली विचार करण्याची पद्धतही खूप महत्त्वाची असते. काहीजण छोट्या-छोट्या गोष्टींचा खूप जास्त विचार करतात. पण यामुळे नातं टिकतं की तुटतं? मानसशास्त्र काय सांगतं?
जास्त विचार करणं (Overthinking) हा माणसाच्या विचार प्रक्रियेचाच एक भाग आहे. पण जेव्हा ते नियंत्रणाबाहेर जातं, तेव्हा वैयक्तिक आयुष्य आणि विशेषतः नात्यांवर गंभीर परिणाम करतं. मानसशास्त्रानुसार, ओव्हरथिंकिंग म्हणजे एखाद्या घटनेबद्दल, बोलण्याबद्दल किंवा वागण्याबद्दल पुन्हा-पुन्हा विचार करणे, त्यात नसलेले अर्थ शोधणे आणि मनात उगाच शंका निर्माण करणे. खासकरून प्रेमसंबंधांमध्ये हे जास्त दिसतं. पार्टनरने बोललेला एखादा छोटा शब्द मोठा करून धरणे, रिप्लाय उशिरा आल्यास त्याला दुर्लक्ष समजणे, भूतकाळातील गोष्टींना वर्तमानाशी जोडणे, या सवयींमुळे नात्यात विनाकारण तणाव वाढतो.
25
कल्पनांना खरं मानणं
मानसशास्त्रानुसार, जास्त विचार करण्याची सवय चिंता (anxiety), कमी आत्मविश्वास आणि असुरक्षिततेच्या भावनेमुळे येते. या भावनांमुळे आपण खरी परिस्थिती समजून घेण्याऐवजी आपल्याच कल्पनांना खरं मानू लागतो. याचा परिणाम म्हणजे पार्टनरवर संशय वाढतो, संवादात अंतर येतं आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून मोठे वाद सुरू होतात.
35
नात्यात विश्वास आणि स्पष्ट संवाद खूप महत्त्वाचा
कोणत्याही नात्यात विश्वास आणि स्पष्ट संवाद खूप महत्त्वाचा असतो. पण ओव्हरथिंकिंग या दोन्ही गोष्टींना धक्का लावते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटू लागतं की पार्टनरचं प्रेम कमी झालंय, तेव्हा त्याच्या वागण्यात बदल होतो. ते जास्त प्रश्न विचारू लागतात, पार्टनरला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात किंवा भावनिकदृष्ट्या दूर जातात. हे बदल दुसऱ्या पार्टनरसाठी त्रासदायक ठरतात आणि नातं कमकुवत होऊ शकतं. मानसशास्त्र सांगतं की, जास्त विचार करणारे लोक चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचीच कल्पना जास्त करतात. या नकारात्मक विचारांमुळे नात्यातला आनंद कमी होतो आणि भीती वाढते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ओव्हरथिंकिंगमुळे व्यक्ती आपल्या भावना योग्यप्रकारे व्यक्त करू शकत नाही. मनात अनेक शंका आणि प्रश्न असल्यामुळे, त्यांना जे सांगायचं आहे ते स्पष्टपणे सांगता येत नाही. यामुळे गैरसमज आणखी वाढतात. मानसशास्त्रानुसार, आपण विचारांवर जितकं जास्त लक्ष केंद्रित करतो, तितकाच ते आपल्यावर जास्त प्रभाव टाकतात.
55
प्रत्येकवेळी जास्त विचार करणं वाईट नाही
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकवेळी जास्त विचार करणं वाईटच असतं असं नाही. काही प्रमाणात विचार केल्यामुळे आपण सावध राहतो आणि चांगले निर्णय घेऊ शकतो. पण जेव्हा हे गरजेपेक्षा जास्त होतं, तेव्हाच समस्या सुरू होते. 'मी आता गरजेपेक्षा जास्त विचार करतोय का?' हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणं महत्त्वाचं आहे. पार्टनरसोबत आपल्या भावना थेट आणि शांतपणे शेअर करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. भूतकाळ किंवा भविष्याऐवजी सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित केल्यास ओव्हरथिंकिंग कमी होतं आणि नातं हेल्दी राहतं.