
Married Life Advice : लग्न म्हणजे दोन व्यक्तींमधील प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणावर उभे असलेले नाते. सुरुवातीला सगळं सुंदर वाटत असलं तरी कालांतराने काही सवयी आणि वागणुकीमुळे नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागतो. अनेकदा ही दुरावा आणणारी कारणे लहान वाटतात, पण वेळेवर लक्ष दिलं नाही तर ती मोठ्या वादात बदलू शकतात. नातं मजबूत ठेवण्यासाठी कोणत्या सवयी टाळायला हव्यात, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
नात्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे खुला संवाद न होणे. अनेक वेळा जोडीदार आपल्याला काय वाटतंय हे न बोलता मनात साठवून ठेवतो. यामुळे गैरसमज वाढतात आणि हळूहळू मनात कटुता निर्माण होते. भावना व्यक्त न केल्याने समोरचा आपल्याला समजून घेत नाही असं वाटू लागतं. त्यामुळे दररोज थोडा वेळ एकमेकांशी शांतपणे बोलणं, आपली मनस्थिती शेअर करणं नात्यासाठी फायदेशीर ठरतं.
नवरा-बायकोच्या नात्यात सततची टीका आणि इतरांशी तुलना ही अत्यंत घातक सवय आहे. “तो नवरा असा करतो”, “ती बायको तशी असते” अशा तुलना ऐकल्याने समोरच्याचा आत्मविश्वास कमी होतो. टीकेमुळे प्रेमाऐवजी राग आणि चिडचिड वाढते. चुका दाखवण्याऐवजी सकारात्मक गोष्टींचं कौतुक केल्यास नात्यात आपुलकी वाढते.
आजच्या धावपळीच्या आयुष्यात काम, मोबाईल आणि सोशल मीडिया यामुळे नवरा-बायकोला एकमेकांसाठी वेळच उरत नाही. घरात असूनही दोघं वेगवेगळ्या जगात वावरत असतात. यामुळे भावनिक अंतर वाढतं. आठवड्यातून किमान एक दिवस एकत्र वेळ घालवणं, साधं बोलणं किंवा फिरायला जाणं नातं पुन्हा जवळ आणू शकतं.
नात्याची पायाभरणी विश्वासावर असते. मात्र, संशय, तपासणी आणि सतत प्रश्न विचारणे यामुळे नात्यात ताण निर्माण होतो. फोन तपासणं, कारण नसताना शंका घेणं या सवयी समोरच्याला गुदमरल्यासारखं वाटू देतात. विश्वास ठेवल्यास नात्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते.
भांडणं प्रत्येक नात्यात होतात, पण त्यानंतर माफी न मागणं आणि जुने विषय उकरून काढणं नात्यासाठी घातक ठरतं. “मी का माफी मागू?” हा अहंकार दुरावा वाढवतो. योग्य वेळी संवाद साधून गैरसमज दूर केल्यास नातं अधिक मजबूत होतं.