नोकरीच्या धावपळीच्या जीवनात तणाव, मानसिक थकवा आणि अस्वस्थता याचा सामना अनेक कर्मचाऱ्यांना करावा लागतो. मात्र, काही साध्या सवयी अवलंबल्यास कामाच्या ठिकाणी आनंदी राहता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कामात आनंदी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सकारात्मक मानसिकता. तणाव, ऑफिसमधील स्पर्धा आणि कामाचा ताण यामुळे नकारात्मक विचार येऊ शकतात. त्यामुळे, दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि छोट्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून करावी, असे तज्ज्ञ सुचवतात.
याशिवाय, काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देताना वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष करू नये. आवश्यक तिथे "नो" म्हणण्याची सवय लावणे, वेळेचे व्यवस्थापन आणि गरजेप्रमाणे ब्रेक घेणे या सवयी आत्मसात केल्यास कामाचा तणाव कमी होतो.
तणाव हाताळण्यासाठी नियमित व्यायाम, ध्यानधारणा आणि योग्य आहार आवश्यक आहे. सतत स्क्रीनसमोर बसल्याने मानसिक थकवा येतो, त्यामुळे दर दोन तासांनी ५ मिनिटांचा ब्रेक घेणे फायद्याचे ठरते.
याशिवाय, कामाच्या ठिकाणी चांगले सहकारी असणेही आनंदासाठी महत्त्वाचे आहे. सकारात्मक आणि मदतीसाठी तत्पर असलेल्या सहकाऱ्यांसोबत वेळ घालवल्यास ऑफिसमधील वातावरण आनंदी राहते. संवाद कौशल्य सुधारून आणि संघभावना वाढवून कामाचा ताण सहज पेलता येतो.
तज्ज्ञ सांगतात की, "कामाचा आनंद घ्यायचा असेल, तर तो फक्त पगार किंवा पदोन्नतीवर अवलंबून ठेवू नका. कामामध्ये अर्थ शोधा, स्वतःमध्ये सुधारणा करा आणि मानसिक शांतीसाठी वेळ द्या."