Brij Bhushan Singh : महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष सुटका, कोण आहे वादग्रस्त नेते?

Published : Aug 03, 2026, 08:21 PM IST
Brij Bhushan Singh : महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष सुटका, कोण आहे वादग्रस्त नेते?

सार

Brij Bhushan Sharan Singh : दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाच्या गाजलेल्या प्रकरणात बृजभूषण सिंह यांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे. कोण आहेत बृजभूषण आणि या निकालातील महत्त्वाचे मुद्दे.

नवी दिल्ली : देशात गाजलेल्या महिला पैलवान लैंगिक शोषण प्रकरणात दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने सोमवारी मोठा निकाल दिला आहे. कोर्टाने माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाने उपलब्ध पुरावे आणि केसमध्ये सादर केलेलं साहित्य बघून बृजभूषण सिंह यांना हा दिलासा दिला. कोर्टातून क्लीन चिट मिळाल्यानंतर बृजभूषण यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाले, त्याच दिवशी मी सांगितलं होतं की, जर दोष सिद्ध झाला तर मी स्वतःला फासावर लटकवून घेईन." जाणून घ्या बृजभूषण शरण सिंह नक्की कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा होता आणि ते नेहमी चर्चेत का असतात?

बृजभूषण शरण सिंह यांच्यावरचं नेमकं प्रकरण काय आहे?

२०२३ साली अनेक महिला पैलवानांनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. यानंतर देशभरात मोठा वाद निर्माण झाला. दिल्लीच्या जंतर-मंतरवर अनेक प्रसिद्ध पैलवानांनी मोठं आंदोलन केलं. या आंदोलनात ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडूही सहभागी झाले होते. या संपूर्ण वादामुळे भारतीय कुस्ती आणि क्रीडा प्रशासनावर अनेक प्रश्न निर्माण झाले. या आरोपांनंतर बृजभूषण शरण सिंह यांना भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर WFI मध्ये नवीन अध्यक्ष निवडण्यावरूनही बराच वाद झाला होता.

कोर्टातून दिलासा मिळाल्यावर काय म्हणाले बृजभूषण सिंह?

कोर्टाचा निकाल आल्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी मीडियाशी बोलताना आपली बाजू मांडली. ते म्हणाले, 'ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाले, तेव्हाच मी म्हणालो होतो की जर दोष सिद्ध झाला तर मी स्वतःला फासावर लटकवून घेईन. आज कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे आणि 'सन्मानपूर्वक निर्दोष' (Honourably Acquitted) या शब्दाचा वापर केला आहे.'

कोण आहेत बृजभूषण शरण सिंह?

उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातल्या विश्नोहरपूर गावात ८ जानेवारी १९५७ रोजी बृजभूषण शरण सिंह यांचा जन्म झाला. आपल्या भागात ते एक मोठे आणि ताकदवान राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. १९८१ मध्ये त्यांचं लग्न केतकी देवी सिंह यांच्याशी झालं. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरही कोसळला होता. २००४ मध्ये त्यांचा २३ वर्षांचा मुलगा शक्ती शरण सिंह याने कथितरित्या स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांचे दुसरे चिरंजीव प्रतीक भूषण सिंह हे गोंडा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत, तर तिसरे चिरंजीव करण भूषण सिंह हे कुस्ती महासंघात जबाबदारी सांभाळण्यासोबतच राजकारणात सक्रिय आहेत.

पैलवानीची आवड आणि कुस्ती संघाचा प्रवास

बृजभूषण सिंह यांना तरुणपणापासूनच कुस्ती आणि पैलवानीची प्रचंड आवड होती. ते आपल्या गृहक्षेत्र गोंडामध्ये मोठ्या प्रमाणात दंगलींचं आयोजन करायचे आणि त्याचा सगळा खर्च स्वतः उचलायचे. दंगल जिंकणाऱ्या पैलवानांना ते स्वतःच्या खिशातून बक्षीस द्यायचे. गोंडाच्या नवाबगंजमध्ये त्यांनी 'नंदिनी नगर' नावाचा एक मोठा परिसर उभारला आहे, जिथे पैलवानांच्या राहण्याची, खाण्याची आणि ट्रेनिंगची आधुनिक सोय आहे. २०११ मध्ये ते भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बनले आणि या पदावर ते बराच काळ राहिले.

राम मंदिर आंदोलनाशी संबंध आणि राजकीय प्रवास

बृजभूषण शरण सिंह यांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आणि वादग्रस्त राहिली आहे. ते एकूण ६ वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. त्यांनी बहुतेक निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तिकिटावर जिंकल्या, पण एकदा (२००९ मध्ये) ते समाजवादी पक्षाच्या तिकिटावरही खासदार झाले होते. १९८५ पासूनच ते राम मंदिर आंदोलनाशी जोडले गेले होते. विश्व हिंदू परिषदेचे मोठे नेते अशोक सिंघल यांचे ते निकटवर्तीय मानले जायचे. १९९२ च्या बाबरी विध्वंस प्रकरणातही त्यांचं नाव आलं होतं, पण मोठ्या कायदेशीर लढाईनंतर सप्टेंबर २०२० मध्ये त्यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं.

शिक्षणाचं मोठं साम्राज्य आणि दबदबा

गोंडाच्या नवाबगंज परिसरात नंदिनी नगर कॉलेजची स्थापना करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपलं मोठं साम्राज्य उभं केलं. आज गोंडा, बहराइच, बलरामपूर आणि श्रावस्ती यांसारख्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या नावावर ५० पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेज चालतात. शिक्षण संस्थांच्या या मोठ्या नेटवर्कमुळे आसपासच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा मानला जातो.

शेरो-शायरी आणि बेधडक अंदाज

बृजभूषण शरण सिंह हे त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी आणि शेरो-शायरीसाठी ओळखले जातात. जेव्हाही ते कोणत्या अडचणीत किंवा वादात सापडतात, तेव्हा ते अनेकदा दोहे किंवा शायरीतून आपली बाजू मांडतात. तिकीट कापलं गेलं किंवा आरोप झाले, तेव्हाही त्यांचा हाच अंदाज दिसला होता. तेव्हा ते म्हणाले होते, 'हुइहै वही जो राम रचि राखा.' २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीकडे कोट्यवधींची चल-अचल संपत्ती आहे. त्यांच्या मूळ गावच्या घरामागे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी खासगी हेलिपॅड आणि अनेक आलिशान गाड्या आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

E-20 पेट्रोलविरोधात नितीन गडकरींच्या घराकडे मोर्चा | E-20 | Nitin Gadkari | Youth Congress
Mohan Bhagwat : RSS प्रमुख मोहन भागवत मुंबईत, जेन-झी आणि जेन-अल्फा तरुणाईशी थेट संवाद साधणार