Unnao Woman Dies by Suicide After Heartbreaking WhatsApp Status : एका महिलेने व्हॉट्सॲप स्टेटसवर व्हिडिओ शेअर करून आपलं दुःख मांडलं. पण हा व्हिडिओ पोस्ट करताच तिने आत्महत्या केली. नातेवाईकांनी पोलिसांना कळवण्याआधीच सगळं संपलं होतं.
आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने व्हॉट्सॲप स्टेटसवर एक व्हिडिओ ठेवला होता. यात तिने आपल्या आयुष्यातील दुःख आणि एकटेपणाबद्दल सांगितलं. हे स्टेटस पाहताच नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना कळवलं. पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. स्टेटस ठेवल्यानंतर काही क्षणांतच महिलेने गळफास घेतला.
26
उन्नावमधील महिला
ही घटना उन्नावच्या सदर कोतवाली परिसरातील प्रियदर्शिनी नगरमध्ये घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, महिला घरात एकटीच होती. कुटुंबीयांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षांपासून तिच्या आयुष्यात एकामागोमाग एक दुःखद घटना घडत होत्या. सुमारे वर्षभरापूर्वी तिच्या आई-वडिलांचं निधन झालं. ती आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने, पती आलोकसोबत माहेरीच राहत होती.
36
पतीच्या निधनाने खचलेली महिला
२ मार्च रोजी महिलेच्या पतीचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या घटनेने ती पूर्णपणे खचून गेली होती. घरात १३ व्या दिवसाचा कार्यक्रम होईपर्यंत नातेवाईकांची ये-जा सुरू होती. त्यामुळे तिचं मन कसं तरी रमलं होतं. पण जेव्हा सर्व नातेवाईक आपापल्या घरी परतले, तेव्हा तिला प्रचंड एकटेपणा जाणवू लागला.
एकटेपणाला कंटाळून त्या महिलेने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात तिने आपल्या मनातील दुःख मांडलं. 'एका स्त्रीला आयुष्यात तीन आधार असतात - आई, वडील आणि नवरा. पण आता माझ्यासाठी यापैकी कोणीही नाही. लोक म्हणतात पुढे सगळं ठीक होईल, पण माझ्यासाठी यापेक्षा वाईट काय होऊ शकतं?' असं तिने व्हिडिओमध्ये रडवेल्या स्वरात म्हटलं आहे.
56
व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दुर्दैवी अंत
हा व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवल्यानंतर, तिने खोलीतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने, तिचा चुलत भाऊ निकेत याने हे स्टेटस पाहिलं आणि तो हादरला. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि स्वतःही तिच्या घराकडे धाव घेतली. पण तोपर्यंत त्या महिलेचा मृत्यू झाला होता.
66
पोलिसांकडून प्रकरणाचा तपास
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली. सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अचानक आलेल्या दुःखामुळे आणि एकटेपणामुळे खचलेल्या लोकांना वेळीच आधार आणि मदत मिळणं किती महत्त्वाचं आहे, हा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा समोर आणला आहे.