
तामिळनाडूचे मंत्री पी. विश्वनाथन यांनी शुक्रवारी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 2029 च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. राज्यात काँग्रेसच्या राजकीय स्थितीबद्दलही त्यांनी विश्वास व्यक्त केला. TVK च्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काँग्रेसच्या ज्या २ आमदारांना मंत्रिपद मिळालं आहे, त्यापैकी विश्वनाथन एक आहेत.
चेन्नईमध्ये बोलताना विश्वनाथन यांनी स्पष्ट केलं की, राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल कोणताही संभ्रम नाही. 2029 च्या निवडणुकीत राहुल गांधीच काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, याची पक्षाला खात्री आहे, असं ते म्हणाले.
विश्वनाथन म्हणाले, "अभिनेता विजय यांना उपपंतप्रधानपदाचे उमेदवार करण्याच्या प्रश्नावर मला काही बोलायचं नाही. आम्हाला खात्री आहे की राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. त्यामुळे दुसऱ्या प्रश्नांना जागाच उरत नाही."
ते पुढे म्हणाले की, तामिळनाडूमध्ये काँग्रेसची राज्य शाखा 'एकदम सक्रिय आणि मजबूत' आहे. राज्यात विजय यांच्या पक्षासोबत आघाडी केल्यानंतर पक्षाच्या भविष्याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला.
विश्वनाथन यांनी सांगितलं की, कन्याकुमारीपासून तिरुत्तनीपर्यंत संपूर्ण तामिळनाडूमध्ये काँग्रेस कार्यकर्ते ताकदीने राजकीय काम करत आहेत. 2029 च्या लोकसभा निवडणुकीला अजून अडीच वर्षे बाकी असली तरी पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
ते पुढे म्हणाले, "कन्याकुमारीपासून तिरुत्तनीपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते ताकदीने राजकारण करत आहेत. लोकसभा निवडणुकीला अजून अडीच वर्षे बाकी असली तरी आम्ही कामाला सुरुवात केली आहे."
विश्वनाथन यांच्या मते, तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष मणिकम टागोर यांनी पक्षासाठी योजना तयार केल्या आहेत आणि त्या योजनांच्या आधारे संघटना वेगाने पुढे जात आहे.
दोन्ही पक्षांमधील संबंधांबद्दलच्या प्रश्नावर ते म्हणाले, "TVK आणि काँग्रेसमध्ये कोणतीही अडचण नाही. अशा गोष्टी सर्वच पक्षांमध्ये होत असतात."
इतर विरोधी पक्षांचे नेतेही आपापल्या पक्षांकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात, या शक्यतेवरही विश्वनाथन यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी, शरद पवार आणि चंद्राबाबू नायडू यांना त्यांचे पक्ष पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करू शकतात.
मात्र, त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की, राहुल गांधीच काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. 2029 च्या निवडणुकीसाठी ते 'एकमेव धर्मनिरपेक्ष पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार' असतील, असंही ते म्हणाले.
"ममता बॅनर्जी, शरद पवार आणि चंद्राबाबू नायडू यांना त्यांचे पक्ष पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करतील. पण 2029 च्या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे एकमेव धर्मनिरपेक्ष पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील," असं ते म्हणाले.
दरम्यान, TVK नेते आणि तामिळनाडूचे मंत्री सेनगोट्टैयन यांनी 'विजयच पंतप्रधान' या TVK च्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. TVK प्रमुख आणि मुख्यमंत्री विजय यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे केलं जात आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, “आमचे नेते याबाबत अगदी स्पष्ट आहेत. तामिळनाडूने त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं आहे. पक्ष स्थापन झाल्यानंतर दोन वर्षांच्या आत पक्षाने मोठा विजय मिळवला आणि दोन महिन्यांत नवीन निवडणूक चिन्ह मिळवून त्यावर विजय मिळवला... तामिळनाडूच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि जनतेच्या इच्छेनुसार योजना राबवण्यासाठी मुख्यमंत्री सर्व आवश्यक पाऊले उचलत आहेत.”