Bengal Politics : पश्चिम बंगाल निवडणूक २०२६ मध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यमग्राममध्ये विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या
सर्वात मोठी धक्कादायक बातमी म्हणजे, मध्यमग्राममध्ये विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय सहकारी आणि पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. चंद्रनाथ रथ एका काळ्या स्कॉर्पिओ गाडीत असताना बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना मृत घोषित केलं.
25
हत्येनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण
मध्यमग्राममधील या हत्येनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांना लक्ष्य करून गोळ्या झाडल्या. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजप नेत्यांनी याला 'राजकीय सूड' म्हटलं आहे, तर टीएमसीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक निकालानंतर अनेक भागांमध्ये तणाव कायम असताना सुवेंदू अधिकारींच्या जवळच्या व्यक्तीच्या हत्येने कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
35
पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपने २०० चा आकडा पार
२९४ जागांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपने २०० चा आकडा पार करत राजकीय इतिहास रचला आहे. १५ वर्षांपासून सत्तेत असलेलं ममता बॅनर्जींचं सरकार या निवडणुकीत पिछाडीवर पडलं. सर्वात मोठा राजकीय धक्का म्हणजे, ममता बॅनर्जी स्वतः भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे केवळ सत्तांतर नसून बंगालच्या राजकीय संस्कृतीतील मोठा बदल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याला 'कामाच्या राजकारणाचा विजय' म्हटलं आहे, तर विरोधकांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 'जनादेश चोरल्याचा' आरोप केला आहे.
पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष समिक भट्टाचार्य (Samik Bhattacharya) यांनी घोषणा केली आहे की, नवीन सरकारचा शपथविधी सोहळा ९ मे रोजी कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर होणार आहे. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. दरम्यान, भाजपने बंगालच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडीसाठी अमित शाह यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केलं आहे, तर आसामसाठी ही जबाबदारी जेपी नड्डा यांच्याकडे दिली आहे.
55
सुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकीनंतरच्या हिंसेवर प्रतिक्रिया
सुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकीनंतरच्या हिंसेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'यावेळची परिस्थिती २०२१ इतकी भीषण नाही.' त्यांनी दावा केला की, 'भाजपला ४६% मतं मिळाली आहेत आणि पुढच्या वेळी हा आकडा ६०% पर्यंत जाईल.' मात्र, कोणत्याही प्रकारची हिंसा स्वीकारार्ह नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. २०२१ च्या निवडणुकीनंतरच्या हिंसेचा उल्लेख करत ते म्हणाले की, त्यावेळी १ लाखांहून अधिक लोकांना घरं सोडावी लागली होती आणि हजारो एफआयआर दाखल झाले होते. यावेळीही अनेक भागांतून हल्ल्याच्या बातम्या येत असल्या तरी, भाजप याला 'मर्यादित घटना' म्हणत आहे.