
मोठ्या माणसांच्या पाया पडण्याची आपली जुनी परंपरा आहे. पण आता या प्रथेवर एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. 'नॉट डेटिंग' (Knot Dating) नावाच्या स्टार्टअपचे सह-संस्थापक जसवीर सिंग यांनी एक प्रश्न विचारला आहे - 'एखादी व्यक्ती फक्त वयाने मोठी आहे म्हणून तिच्या पाया पडावं का?' त्यांच्या मते, आदर हा मनापासून वाटला पाहिजे, केवळ एक सामाजिक रीत म्हणून तो करू नये.
जसवीर सिंग यांनी 'X' (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट केली. त्यात ते म्हणतात की, केवळ वयामुळे कुणाच्या पाया पडणं ही एक सवय होऊन जाते, त्यात खरा आदर नसतो. पिढ्यानपिढ्या चालत आलंय म्हणून आपण ही प्रथा का पाळावी, असा सवाल त्यांनी केला आहे.
Touching someone's feet just because they're older should stop. That isn't respect, that's social conditioning.
Most people in भारत don’t do it out of respect, they do it because they’ve been programmed since childhood.
They bend because everyone else is bending. They don't…— Jasveer Singh (@jasveer10) August 20, 2026
सिंग यांनी लिहिलं, "फक्त कोणीतरी वयाने मोठं आहे म्हणून त्यांच्या पाया पडणं थांबवलं पाहिजे. हा आदर नाही, हे तर आपल्यावर झालेले सामाजिक संस्कार (social conditioning) आहेत."
त्यांनी पुढे म्हटलं की, लहानपणीच आपल्याला घरातले मोठे नातेवाईकांच्या पाया पडायला शिकवतात. त्यामुळे मोठेपणी ही गोष्ट इतकी सवयीची होऊन जाते की, समोरच्या व्यक्तीबद्दल खरंच आदर आहे की नाही, याचा विचार न करताच आपण पाया पडतो.
फक्त वय वाढल्याने कुणीही आदरास पात्र ठरत नाही, असंही सिंग यांचं म्हणणं आहे. वय वाढणं ही काही मोठी अचिव्हमेंट किंवा कामगिरी नाही, असं ते ठामपणे सांगतात.
त्यांनी लिहिलं, "वय ही काही कामगिरी नाही. कुणाचे काका, मावशी, नातेवाईक किंवा वडीलधारे असण्याने ते आपोआप आदरास पात्र ठरत नाहीत. जर फक्त वयामुळे आदर मिळत असता, तर प्रत्येक वृद्ध व्यक्ती शहाणी असती, पण आपल्याला माहित आहे की तसं नसतं."
धार्मिक कपडे घातल्याने किंवा रक्ताचं नातं असल्यानेही कुणी आदरास पात्र ठरत नाही, असं सिंग यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या मते, आदर हा चारित्र्य, शहाणपण, प्रामाणिकपणा आणि महत्त्वपूर्ण कामगिरीतून मिळवला जातो.
ते पुढे लिहितात, "धार्मिक कपडे घातल्यानेही आदर मिळत नाही. रक्ताचे नातेवाईक असण्याने तर अजिबात नाही. आदर हा चारित्र्याने मिळवला जातो, बाकी कशानेही नाही. अशा व्यक्तीच्या पाया पडा ज्याने तो खरोखर कमावला आहे. ज्यांच्या चारित्र्याचा तुम्हाला हेवा वाटतो, ज्यांच्याकडे ज्ञान, शहाणपण, सचोटी आहे किंवा ज्यांनी काहीतरी अर्थपूर्ण मिळवलं आहे, ज्यांच्या आयुष्याकडे पाहून तुम्हाला वाटतं की, मला या व्यक्तीकडून काहीतरी शिकायचं आहे."
सिंग यांच्या मते, लहानपणापासून आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळे आपण अनेकदा सक्तीने या गोष्टी करतो. मात्र, याचा अर्थ मोठ्यांचा अनादर करा किंवा उद्धटपणे वागा, असा अजिबात नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं.
त्याऐवजी, आदर हा सामाजिक दबावातून नाही, तर मनापासून, कौतुकातून आणि विश्वासातून यायला हवा. जेव्हा तुम्हाला मनापासून वाटेल, तेव्हाच पाया पडा, असं सिंग यांचं म्हणणं आहे.