Why throw coins in river : प्रवासात नदी दिसली की खिशातून नाणे काढून पाण्यात फेकण्याची अनेकांना सवय असते. तुम्ही हे फक्त नशिबासाठी किंवा देवावरील श्रद्धेपोटी करत असाल, तर तुमचा समज पूर्णपणे चुकीचा आहे.
आपल्या देशात लोक नद्यांना केवळ पाण्याचा स्रोत मानत नाहीत, तर त्यांची देवी म्हणून पूजा करतात. गंगा, कृष्णा आणि गोदावरी यांसारख्या नद्या आपल्या संस्कृतीचा पाया आहेत. प्राचीन काळी याच नद्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत होत्या. त्यामुळे या नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी आपले पूर्वज अनेक पद्धतींचा अवलंब करत असत.
26
थक्क करणारे वैज्ञानिक कारण
प्रवासात एखादी नदी किंवा कालवा दिसला की आपण लगेच खिशातून एक रुपयाचे नाणे काढून पाण्यात फेकतो. लहानपणापासून मोठ्यांना असे करताना पाहून आपणही ही सवय लावून घेतली आहे. अनेक लोक विचार करतात की आपण हे केवळ नशिबासाठी किंवा देवाला नवस म्हणून करतो. पण, आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या प्रत्येक परंपरेमागे एक भक्कम वैज्ञानिक कारण दडलेले आहे. नदीत नाणी फेकण्यामागचे ते रहस्य काय आहे ते जाणून घेऊया.
36
ही परंपरा का सुरू झाली?
जुन्या काळी लोक पूर्णपणे 'तांब्या'पासून (Copper) बनवलेली नाणी वापरत असत. तेव्हा आजच्यासारखे वॉटर फिल्टर किंवा प्युरिफायर नव्हते. गावोगावचे लोक थेट नद्या आणि तलावांचे पाणी पिण्यासाठी वापरत असत. तांब्यामध्ये पाणी शुद्ध करण्याची अद्भुत क्षमता असते, हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे. पाण्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्याची ताकद तांब्यात असते. त्यामुळे पाणी शुद्ध राहावे आणि लोकांचे आरोग्य सुधारावे, या चांगल्या हेतूने पूर्वजांनी नदीत तांब्याची नाणी फेकण्याची प्रथा सुरू केली.
आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख खनिजांपैकी तांबे हे एक आहे. तांब्याची नाणी पाण्यात असताना, त्यातील घटक पाण्यात मिसळतात आणि पिण्याच्या पाण्यावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतात. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढते. म्हणूनच नदी ओलांडताना पाण्यात नाणे टाकणे ही त्याकाळी लोक आपली सामाजिक जबाबदारी मानत असत. यामुळे नदीचे पाणी नेहमी शुद्ध राहायचे.
56
आज नेमके काय घडत आहे?
काळानुसार परिस्थिती बदलली आहे. सध्या आपण वापरत असलेली नाणी तांब्याची नसून स्टेनलेस स्टील किंवा ॲल्युमिनियमची असतात. ही नाणी पाण्यात फेकल्याने आरोग्याला कोणताही फायदा होत नाही, उलट आपण पाणी प्रदूषित करतो.
66
अंधानुकरण करणे थांबवा
तांब्याचे नाणे टाकण्यामागचे वैज्ञानिक कारण विसरून, आज आपण ही केवळ एक अंधश्रद्धा म्हणून पाळत आहोत. आपली कोणतीही परंपरा अर्थहीन नाही, पण आपण त्यामागचा मूळ उद्देश समजून घेतला पाहिजे. आजची स्टीलची नाणी नदीत फेकून पाणी प्रदूषित करण्याऐवजी, नद्या स्वच्छ ठेवणे हाच आपल्या संस्कृतीचा खरा सन्मान ठरेल.