
मुंबई : दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनावेळी झालेल्या पेलेट हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलीस आता गुन्हा दाखल करणार आहेत. सध्या अज्ञात व्यक्तींविरोधात हा गुन्हा नोंदवला जाईल. जखमी विद्यार्थ्याचा जबाब नोंदवल्यानंतर यामध्ये आणखी कलमं जोडण्यावर विचार केला जाईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.
या प्रकरणात जखमी झालेल्या तरुणाला घेऊन राहुल गांधी स्वतः तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचले होते. पण तिथल्या पोलिसांनी विद्यार्थ्याची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे राहुल गांधी थेट पार्लमेंट स्ट्रीटवर असलेल्या सेंट्रल दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांच्या (DCP) ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली.
सुरुवातीला राहुल गांधी आणि तो जखमी विद्यार्थी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला गेले होते. पण तिथल्या पोलिसांनी केस नोंदवून घ्यायला नकार दिला. म्हणूनच त्यांना पार्लमेंट स्ट्रीटवरील डीसीपी ऑफिसमध्ये जावं लागलं.
काय आहे प्रकरण?
'संसद चलो' मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर पेलेट गन वापरल्याचे गंभीर आरोप झाले होते. या पोलीस कारवाईत साहिल लोचब नावाचा १९ वर्षांचा तरुण जखमी झाला होता. त्याची दृष्टी जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण, दिल्ली पोलीस आणि सरकारने मात्र आंदोलकांवर पेलेट गन वापरल्याचा इन्कार केला होता. हा दावा खोटा ठरवत राहुल गांधींनी जखमी विद्यार्थ्यांना मीडियासमोर आणलं. त्यांच्या शरीरातून काढलेल्या पेलेट्सचे मेडिकल रिपोर्टही त्यांनी जाहीर केले आणि आंदोलन अधिक तीव्र केलं होतं.