
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या टीमची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी या पदाधिकाऱ्यांना जनतेशी नाळ जोडून ठेवण्याचा आणि संघटना आणखी मजबूत करण्यासाठी काम करण्याचा सल्ला दिला.
शनिवारी भाजपच्या मुख्यालयात झालेली ही बैठक तब्बल पाच तासांपेक्षा जास्त वेळ चालली. पक्षात संघटनात्मक बदल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली ही पहिलीच बैठक होती. भाजपच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि आपले विचार व कामाचा अनुभव पंतप्रधानांसमोर मांडला. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी प्रत्येक पदाधिकाऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना आपले विचार मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला. त्यांनी नव्या टीमला मार्गदर्शन केलं आणि पक्षाची विचारधारा मजबूत करत देशसेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा सल्ला दिला.
पंतप्रधानांनी 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटलं, "संघटनात्मक बैठका म्हणजे पक्षाला मजबूत करण्यासाठी आणि जनतेशी संपर्क अधिक घट्ट करण्यासाठी नवीन कल्पना आणि दृष्टिकोन मिळवण्याची संधी असते. पक्षाचे सहकारी आणि नव्या संघटनात्मक टीमसोबत छान संवाद झाला!"
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितलं की, पक्षाची नवी टीम तयार झाल्यानंतर ही बैठक झाली. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनामुळे संघटनेला आपली विचारधारा पुढे नेण्यास आणि देशाच्या हितासाठी काम करत राहण्यास मदत होईल. विनोद तावडे यांनी घोषणा केली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळात देशव्यापी 'सेवा संकल्प अभियान' सुरू करणार आहे. पंतप्रधान मोदींच्या सार्वजनिक जीवनाशी जोडलेली सेवेची भावना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणं हा या अभियानाचा उद्देश आहे, असं ते म्हणाले.
तावडे म्हणाले की, या अभियानांतर्गत विविध सेवाभावी उपक्रम, लाभार्थ्यांना सरकारी योजनांशी जोडणारे कार्यक्रम आणि तरुणांना सेवा व नवनिर्माणासाठी प्रोत्साहित करणारे उपक्रम आयोजित केले जातील. ते म्हणाले, "पहिल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर, 'सेवा संकल्प अभियाना'साठी प्रत्येक राज्यातून निवडलेल्या सात ते आठ कार्यकर्त्यांच्या टीमसाठी, राज्य अध्यक्ष आणि संघटना सरचिटणीसांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. पक्ष हे अभियान देशभरात बूथ स्तरापर्यंत पोहोचवण्याची तयारी करत आहे."
तावडे यांनी पुढे सांगितलं की, भाजप दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा पखवाडा' (सेवा पंधरवडा) आयोजित करतो. यावर्षीचं अभियान महत्त्वाचं आहे, कारण ७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींनी २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच पक्षाने महिनाभर 'सेवा संकल्प अभियान' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अभियानादरम्यान, भाजप कार्यकर्ते अंगणवाडी सेविकांचा सन्मान करतील आणि त्यांच्यासोबत 'मातृ संवाद' कार्यक्रमांचे आयोजन करतील. पक्षाचे कार्यकर्ते देशभरातील १.४ दशलक्षपेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रांपर्यंत पोहोचून बाल पोषण आणि काळजीमध्ये गुंतलेल्या सेविकांच्या योगदानाला सलाम करतील. भाजप 'सेवा में मेरा योगदान' (सेवेत माझे योगदान) हा उपक्रमही राबवणार आहे. यामध्ये स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि टीबी रुग्णांना शोधून त्यांना सरकारी योजनांशी जोडण्यासारख्या सेवा कार्यांचे रील्स बनवण्यासाठी तरुण आणि नागरिकांना प्रोत्साहित केलं जाईल.
तावडे म्हणाले की, 'सेवा सेतू अभियाना'मुळे पात्र लाभार्थी सरकारी कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाहीत याची खात्री केली जाईल. या उपक्रमांतर्गत, लोकांना आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यांसारख्या योजनांमध्ये नावनोंदणी करण्यास मदत करण्यासाठी ब्लॉक स्तरावर १५ दिवसांसाठी विभाग-स्तरीय शिबिरं आयोजित केली जातील. भाजप तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी 'नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज'चंही आयोजन करणार आहे. यामध्ये ब्लॉक, जिल्हा आणि राज्य स्तरावर संशोधन आणि नवनिर्माणाच्या माध्यमातून स्थानिक समस्यांवर उपाय मागवले जातील. पक्षाने सांगितलं की, राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा पूर्ण झाली असून, राज्यस्तरीय कार्यशाळा ३१ ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर जिल्हा व ब्लॉक स्तरावरील कार्यशाळा आयोजित केल्या जातील.
'सेवा संकल्प अभियान' १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळात चालणार असून भाजप कार्यकर्ते ते बूथ स्तरापर्यंत पोहोचवतील.
या बैठकीत भाजपने 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावर एक ठरावही मंजूर केला. काँग्रेस कार्यकारिणीने पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताचे फक्त पहिले दोन कडवेच गाण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचा भाजपने निषेध केला. भाजपने म्हटलं आहे की, 'वंदे मातरम्' हे भारताचे राष्ट्रगीत, भारत मातेबद्दल आदराची भावना, स्वातंत्र्य संग्रामाचा मंत्र आणि भारताच्या राष्ट्रीय चेतनेचं प्रतीक आहे. 'वंदे मातरम्'ला दोन कडव्यांपुरतं मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाला पक्ष विरोध करेल आणि सहा कडव्यांच्या संपूर्ण राष्ट्रगीताचा सन्मान आणि वारसा जपेल. त्याचा इतिहास आणि महत्त्व याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवण्याची घोषणाही पक्षाने केली.
भाजपच्या नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय टीममध्ये विनोद तावडे आणि सुनील बन्सल हे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कायम आहेत, तर बिप्लब कुमार देब, स्मृती इराणी, सतीश पुनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांना नवे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून संधी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर राजेश मंगल यांची राष्ट्रीय सह-कोषाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे, बैजयंत जय पांडा आणि रेखा वर्मा यांना उपाध्यक्ष म्हणून कायम ठेवण्यात आलं आहे. तिरथ सिंह रावत, मनप्रीत सिंग बादल, राम माधव आणि डी. पुरंदेश्वरी हे इतर राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी आहेत. बी. एल. संतोष हे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) म्हणून कायम राहतील, तर शिवप्रकाश आणि सौदान सिंह यांची राष्ट्रीय सह-सरचिटणीस (संघटना) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजक म्हणून नियुक्ती केली असून, प्रीती गांधी, शिवानंद द्विवेदी, आलोक भट्ट आणि अरुण यादव हे सोशल मीडिया सह-संयोजक असतील. अनिल बलुनी यांची माध्यम संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, आशिष उषा अग्रवाल, प्रदीप भंडारी आणि सिद्धार्थ यादव हे माध्यम सह-संयोजक असतील.
भाजपने आपल्या विविध मोर्चांसाठी नवीन अध्यक्षांचीही घोषणा केली. हेमांग जोशी युवा मोर्चाचे, रूप कुमारी चौधरी महिला मोर्चाचे, अमरपाल मौर्य ओबीसी मोर्चाचे, बन्सीलाल गुर्जर किसान मोर्चाचे, शिवेश कुमार राम एससी मोर्चाचे, डॉ. मन्नालाल रावत एसटी मोर्चाचे आणि कुंवर बासित अली अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष असतील.