
Snake Bite : मध्य प्रदेशातील एका महिलेसोबत एक थरारक घटना घडली आहे. अवघ्या दोन मिनिटांच्या अंतराने पाच वेळा विषारी सापाने दंश करूनही या महिलेचा जीव वाचला आहे. डॉक्टरांनी तब्बल ३५ 'अँटी-स्नेक व्हेनम' (ASV) इंजेक्शन देऊन तिचे प्राण वाचवले. ही अविश्वसनीय घटना मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील झिल पिपरिया गावात घडली आहे.
राधबाई अहिरवार असं या महिलेचं नाव आहे. १३ जुलै रोजी दुपारी त्या आपलं स्वयंपाकघर साफ करत होत्या. त्यावेळी भांड्यांच्या कपाटामागे सुमारे ५ फूट लांबीचा एक काळा विषारी साप लपलेला त्यांना दिसला. काही कळायच्या आतच त्या सापाने राधबाईंच्या उजव्या हातावर पहिला दंश केला. घाबरून त्यांनी हात झटकला, पण साप आणखीच चवताळला आणि त्याने एकापाठोपाठ एक असे एकूण पाच वेळा त्यांच्या हातावर दंश केला.
सर्पदंशानंतर राधबाईंच्या कुटुंबीयांनी वैज्ञानिक उपचारांऐवजी त्यांना एका मांत्रिकाकडे नेण्याची मोठी चूक केली. यात बराच मौल्यवान वेळ वाया गेला. जेव्हा मंत्र-तंत्राने काहीच फरक पडला नाही आणि विष शरीरात पसरायला लागलं, तेव्हा कुटुंबीयांनी तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केलं.
रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. पहिल्या ४० मिनिटांतच राधबाईंना १० 'अँटी-स्नेक व्हेनम' (ASV) इंजेक्शन्स देण्यात आली. त्यानंतर पुढच्या २४ तासांत विषाचा प्रभाव पूर्णपणे कमी करण्यासाठी आणखी २५ इंजेक्शन्स द्यावी लागली. विषाच्या तीव्रतेमुळे त्यांच्या एका बोटात गंभीर इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे डॉक्टरांना एक छोटी शस्त्रक्रियाही करावी लागली.
जवळपास २४ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर राधबाईंची प्रकृती धोक्याबाहेर आली. सध्या त्या पूर्णपणे बऱ्या आणि निरोगी आहेत. डॉक्टरांनी या घटनेनंतर स्पष्ट केलं आहे की, साप चावल्यानंतर वेळ न घालवता रुग्णाला थेट रुग्णालयात आणून 'अँटी-व्हेनम' देणं हाच जीव वाचवण्याचा एकमेव वैज्ञानिक मार्ग आहे.