
मलप्पुरम: जंगली जनावरांच्या त्रासाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केरळमधील एका तरुण इंजिनिअरने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) वर आधारित एक खास तंत्रज्ञान विकसित केलं आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील करुवारकुंडमधील तरिश गावचा रहिवासी असलेल्या रिषानने एक असा AI कॅमेरा बनवला आहे, जो शेतात जंगली प्राणी शिरताच ओळखतो आणि त्याचा फोटो काढून थेट शेतकऱ्याच्या मोबाईलवर अलर्ट पाठवतो.
केरळच्या डोंगराळ भागांमध्ये जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचं रोज लाखो रुपयांचं नुकसान होतं. या समस्येवर तोडगा काढण्याच्या विचारातूनच हा कॅमेरा तयार केल्याचं रिषान सांगतो.
रिषानच्या मते, हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांच्या त्रासातून कायमची सुटका देऊ शकतं. पण यासाठी त्याला स्थानिक शेतकऱ्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. शिवाय, सरकारी आर्थिक मदत मिळाल्यास हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर विकसित करता येईल, असंही तो म्हणतो. हा AI कॅमेरा शेतकऱ्यांची एक मोठी समस्या सोडवू शकतो आणि त्यांचं आर्थिक नुकसान टाळू शकतो. विशेष म्हणजे, हे कॅमेरे अगदी कमी खर्चात शेतात बसवता येतील, असंही रिषानने स्पष्ट केलं. रिषानने त्रिशूर इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असून तो तरिश येथील नेचिकाडन हमसा यांचा मुलगा आहे.