
मुंबई (10 मार्च): पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. बंगळुरूसारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये गॅस पुरवठा जवळपास थांबला आहे. याचा परिणाम आता थेट IPL 2026 वर होण्याची शक्यता आहे. अनेक हॉटेल्स बंद झाली आहेत आणि ज्यांच्याकडे थोडाफार गॅस शिल्लक होता, तोही आता संपत आला आहे. पश्चिम आशियात अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढल्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी मालवाहतूक थांबली आहे. याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसलाच, पण आता IPL च्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
IPL 2026 सुरू व्हायला आता फक्त तीन आठवडे शिल्लक आहेत. BCCI च्या अंदाजानुसार, स्पर्धा मार्चच्या अखेरीस सुरू व्हायला हवी. पण पश्चिम आशियातील युद्ध आणि देशातील विधानसभा निवडणुकांमुळे अजून वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. त्यातच आता या गॅसच्या समस्येची भर पडली आहे. आयपीएलमध्ये १० संघ आहेत आणि त्यांचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ मिळून कमीत कमी १० मोठ्या हॉटेल्समध्ये थांबतात. पण सध्या अनेक मोठ्या हॉटेल्सनाच गॅसच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खेळाडूंच्या राहण्याची सोय कशी करायची, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रत्येक आयपीएल टीममध्ये खेळाडू, कोच आणि इतर स्टाफ मिळून ३० ते ५० सदस्य असतात. अशा १० टीम्सच्या राहण्याची सोय करणं हॉटेल्ससाठी सध्याच्या परिस्थितीत खूप अवघड आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती अशीच राहिली, तर IPL 2026 पुढे ढकलण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली भूमिका अधिक कडक केली आहे, तर दुसरीकडे इराणनेही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा एक थेंबही बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे हे संकट लवकर मिटण्याची चिन्हं दिसत नाहीत.
या सगळ्या परिस्थितीवर BCCI बारकाईने लक्ष ठेवून आहे. आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ यांनी सांगितलं की, 'आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. हॉटेल्सकडून आम्हाला अजून कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. गॅस पुरवठ्याबाबत सरकार काय निर्णय घेतं, याकडे आमचं लक्ष आहे. आम्हाला काही दिवसांत यावर स्पष्टता हवी आहे.' स्पर्धेच्या तयारीसाठी कमीत कमी दोन आठवड्यांचा वेळ लागतो, त्यामुळे लवकरच निर्णय घ्यावा लागेल, असंही धुमाळ म्हणाले.
संकट फक्त गॅसच नाही, तर प्रवासाचंही आहे. जर हे युद्ध असंच सुरू राहिलं, तर विमानसेवांवरही परिणाम होईल. परदेशी खेळाडूंना भारतात येणं कठीण होऊ शकतं. याचा मोठा फटका फ्रँचायझींना बसेल. त्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी फ्रँचायझींकडून केली जाऊ शकते. T20 वर्ल्ड कपनंतर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ भारतातच अडकून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशी खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध होतील की नाही, याबाबतही शंका आहे.